कॅंडी :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात झाली. मात्र, भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, स्थानिक हवामान खात्याने तसेच क्यु वेदर या संकेतस्थळाने 2 सप्टेंबरला होत असलेल्या या सामन्यात पाऊस व्हिलन ठरेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
कॅंडी येथील पाल्लेकेले येथे दोन सप्टेंबर रोजी पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. क्यू वेदर डॉट कॉम या संकेतस्थळावरही हीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन सप्टेंबरला येथे 70 टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होल्टेज ड्रामा भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. दुपारी 70 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज असला तरीही संध्याकाळी पावसाची शक्यता कमी प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळे ही लढत खेळवण्यात आली नाही, तर राखीव दिवस ठेवण्यात आलेला नसल्याने गुण विभागणी केली जाईल.
तीन सामन्यांची शक्यता …
भारत व पाकिस्तानमध्ये आशियाई करंडक स्पर्धेत तीन वेळा लढत होण्याची दाट शक्यता आहे. हे दोन्ही संघ साखळी फेरीत एकमेकांसमोर येणार आहेत. या दोन संघांनी सुपर फोरमध्ये स्थान मिळवले तर पुन्हा त्यांच्यात लढत होणार आहे. या गटात अव्वल राहण्यात या दोन संघांना यश आले तर त्यांच्यात अंतिम फेरीची सामनाही रंगेल.