बारामती -करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती पाच दिवस बंद होती. शनिवारी (दि. 28) सहाव्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात भाजीपाल्याचे लिलाव झाले.
पालेभाज्या 1550 पेंड्या तर फळ भाज्या व फळे मिळून 400 क्विंटल शेतमालाची आवक झाली. दरम्यान, पाच दिवस बाजार समिती बंद राहिल्याने शेतकरी व बाजार समितीचे जवळपास 50 लाख रुपयांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांची व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भाजीपाल्याचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत. लिलाव सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांनी गर्दी करू नये यासाठी देखील उपाययोजना राबविल्या आहेत. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत जळोची उपबाजार समिती येथे भाजीपाल्याचे लिलाव सुरू राहिले.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीने अवलंबलेल्या टोकन पद्धतीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी टळली. टोकन नंबर नुसार शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची विक्री केली. लिलाव संपल्यानंतर बाजार समितीच्या व नगरपरिषदेचे सफाई कामगारांनी स्वच्छता केली तसेच नगरपरिषदेने औषध फवारणी केली.
बारामतीत 45 ठिकाणी मंडई
बारामती शहरातील 45 ठिकाणांवर आज मंडई भरली जळोची उपबाजार येथील भाजीपाल्याचे लिलाव झाल्यामुळे श्री गणेश मंडई येथील विक्रेत्यांनी भाजीपाला तसेच मंडईची खरेदी केली त्यानंतर पोलीस प्रशासन व नगर परिषदेने ठरवून दिलेल्या ठिकाणी मंडईचे स्टॉल उभे केले होते. शहरातील 19 प्रभागांमध्ये मंडई सुरू राहिली. प्रभागातच मंडई उपलब्ध झाल्याने नागरिकांची गर्दी टळली आहे.
शेतकरी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी जळोची उपबाजार येथे भाजीपाला व मंडईचे लिलाव करण्यात आले. नेहमीपेक्षा 50 टक्क्यांनी शेतमालाची आवक घटली. लिलावादरम्यान शेतकऱ्यांच्या स्वच्छतेची काळजी घेण्यात आली . हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच टोकन सिस्टीम ठेवण्यात आल्यामुळे गर्दी झाली नाही.
– अरविंद जगताप,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती