मंचर -पारगाव-शिंगवे (ता. आंबेगाव) येथील आठवडे बाजारात तरकारी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभाव गडगडले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर तरकारीचे बाजारभाव सुधारतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पारगाव येथे शुक्रवारी आठवडे बाजार भरतो.
भीमाशंकर साखर कारखान्यातील अधिकारी, सेवक वर्ग, ऊसतोड मजुर तसेच शिंगवे, पारगाव, काठापूर, देवगाव, लाखणगाव, पोंदेवाडी, निरगुडसर, जारकरवाडी, भागडी आदी गावातून नागरिक येथील बाजारात विविध वस्तू खरेदीसाठी येतात.बाजारभाव घसरल्याने तरकारी भाजीपाला स्वस्त मिळत आहे.
टोमॅटो 5 ते 10 रुपये किलो, मिरची 15 ते 25 रुपये, मेथी, कोथिंबीर जुडी 2 ते 8 रुपये, बीट 2 रुपये, फ्लॉवर 5 रुपये, कोबी 5 रुपये, वाटाणा शेंग 20 ते 25 रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती व्यापारी संतोष पाबळे आणि महेश साळे यांनी दिली.
येथील बाजारकरुंना ग्रामपंचायतीने सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी केली आहे.