पुणे (प्रभात वृत्तसेवा) – मार्केट यार्डात रविवारी केवळ फळभाज्या आणि पालेभाज्यांची खरेदी विक्री होणार आहे. सोमवारी फळे आणि कांदा बटाटा विभागातील व्यवहार सुरू राहणार आहेत. एक दिवस आड भाजी आणि फळे, कांदा- बटाटा विभागाचे बाजार सुरू राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. दरम्यान बहुतांशी आडते आणि कामगार कामावर येण्यास तयार झाले आहेत. जे आडते कामावर येणार नाहीत. त्यांचे गाळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ताब्यात घेण्या येणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी नमूद केले. ते पुढे म्हणाले, रविवारी बाजारात केवळ ठोक विक्रेते आणि बाजार समितीचा परवाना असलेले कामगार आणि आडते यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ह करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
त्या आडत्यांवर होणार फौजदारी कारवाई
मार्केट यार्ड सुरळीतपणे सुरू झाले असून आडते असोसिएशन आणि काही आडते बाजार बंद असल्याची अफवा पसरवत आहेत, हे चुकीचे आहे. अशा आडत्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि बाजार समिती अधिनियम नुसार फौजदारी स्वरूपाची करण्यात येईल. त्यांच्या या बंदच्या आवाहनामुळे काही दुष्परिणाम झाल्यास ते स्वतः त्याला जबाबदार असणार आहेत. काही आडते फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून बाजार बंद असल्याचे सांगत आहे. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बाजार समितीचे प्रशासक देशमुख यांनी सांगितले
फळे भाजीपाला आणि कांदा-बटाटा हे तिन्ही विभाग एकत्र सुरू असल्यास जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका दिवशी भाजीपाला आणि दुसऱ्या दिवशी फळे, कांदा -बटाटा विभाग सुरू राहणार आहे. हे रोटेशनचे चित्र पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. शहरात भाजीपाल्याचे सुरळीत आवक सुरू झाली आहे .रविवारी सोशल डिस्टन्स ठेवून खरेदीदारांनी खरेदीसाठी यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, जे व्यापार करण्यास तयार आहेत. अशा व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर गाळे उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले