चिखलात पडलेला धान पाहून डोळ्यात अश्रू ; खेडच्या पश्चिम भागात 60 टक्के भात पिके सडली
पाईट,- यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने “दाता नव्हे वैरी’ असे म्हणायची वेळ भात उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे यावर्षी धानाची परिपूर्ण अवस्था होऊन गेली असून सुद्धा पाऊस पडत असल्याने चिखलात पडलेले धान पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे चिखलात धान पडल्याने उत्पादन तर नाहीच पण जनावरांसाठी तयार होणारा पेंढा ही शेतातच सडून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम भागात भात कापणी सुरुवात झाली आहे. दरम्यान, खेड तालुक्यातील पश्चिम भागात सरासरी एक हजार मिमी पाऊस कोसळतो त्यामुळे बहुतांशी शेतकरी भात पिकाचे उत्पादन घेतात. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागात 1 हजार 350 मिमीपेक्षाही अधिक पाऊस पडला असल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भात उत्पादन अतिशय नगण्य झाले असल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात जास्त बसला. मृग नक्षत्रापासून पावसाने सुरुवात केली असून नोव्हेंबर महिना सुरू झाला असून सुद्धा पाऊस कोसळतच असल्याने शेतीतील मशागत करण्यासही शेतकऱ्यांना वापसा मिळाला नाही. गेली सतत तीन आठवडे मुसळधार पाऊस पडल्यामुळे 60 टक्के भात खाचरांमधील भात रोपे सडून गेली आहेत.
- दुहरी संकटामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका
मध्यंतरीच्या काळात पाऊस नसल्याने तापमान वाढून दाट धुके पडत असल्याने खूप मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव पिकांवर झाला असल्याने बळीराजावर दाही दिशांनी संकटा मागून संकट उभी राहिली. वारंवार कीड नाशक फवारण्या करूनसुद्धा कीड व रोगांवर नियंत्रण येत नसल्याने शेतकरी हतबल झाला होता त्यातच पावऊस थांबायचे नाव घेत नसल्याने व वारंवार फवारण्या कराव्या लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. - निम्म्यापेक्षा अधिक घट
भात फुलोऱ्यात आल्यावर भात पिकांना पावसाच्या पाण्याबरोबरच प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते यामुळे धनामध्ये तांदळाची उत्पत्ती होते. यावर्षी पावसाचा जोर ओसरला नसल्याने उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट आली असून शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला असल्याने जगाच्या पोशिंद्यावरच उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे.