नवी दिल्ली : उत्तर भारतातील प्रदुषणपासून आपल्याला वाचवावे. त्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात असे साकडे ज्येष्ठ क्रिकेटपटू हरभजन सिंगनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे. दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनाही हरभजन सिंगने या घातक प्रदुषणावर उपाय योजना करण्याचे आवाहन केले आहे.
“मला उत्तर भारतातील प्रदूषणाबद्दल बोलायचे आहे. माझ्यासह आपण सर्वजण यासाठी एक कारण आहोत. आम्ही कार चालवितो, इंधन जाळतो आणि पर्यावरणाला हानी पोहोचवितो. चारा जाळण्यामुळे बरेच प्रदूषण होते, हे देखील आम्ही गेल्या काही वर्षांत शिकलो आहोत. या भागात राहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी हे हानिकारक आहे. त्यामुळे आमचे आयुर्मान अंदाजे 10 वर्षांनी कमी होईल, हेही आपण शिकलो आहोत. हे सर्वकाही ध्यानात घेऊन सर्वांच्याच फायद्याची योजना निश्चित करावी. यासाठी लवकरात लवकर बैठक बोलवावी, अशी आपली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.’ असे हरभजनने ट्विटरवरच्या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे.
अलिकडेच राष्ट्रीय राजधानीच्या परिसरामधील हवेतील प्रदूषणाची पातळी “अतिशय घातक’ स्तरापर्यंत घसरली आहे. काही ठिकाणी या प्रदुषणाची पातळी 999 पर्यंत वाढली आहे. या घातक प्रदुषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची घोषणा दिल्ली आणि राजधानीच्या परिसरात करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत शाळांनाही सुटी देण्यात आली आहे.