माधव विद्वांस
विविध विषयांवर ललित आणि वैचारिक लेखन करणारे, स्वतंत्र विचाराचे साहित्यिक, प्राध्यापक तसेच अस्पृश्यताविरोधी कार्य करणारे समाजसेवक श्रीपाद महादेव माटे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म विदर्भातील शिरपूर या गावी 2 सप्टेंबर 1886 रोजी झाला. त्यांचे शिक्षण सातारा व पुणे येथे एमएपर्यंत झाले होते.
त्यांना विद्यार्थीदशेत रॅंग्लर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, गो. चिं. भाटे यांसारख्या थोर अध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले होते. शिक्षण घेतल्यानंतर 1935-46 या कालखंडात पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
माटे यांनी त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीच्या सुरुवातीस “केसरीप्रबोध’ या ग्रंथाचे एक संपादक म्हणून काम केले. वर्ष 1933-1935 या कालखंडात “महाराष्ट्र सांवत्सरिक’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. सांवत्सरिक म्हणजे प्रतिवर्षी नियमितपणे प्रकाशित होणारे व संदर्भमूल्य असलेले नियतकालिक.
मात्र त्यांनी इंग्रजी सांवत्सरिकाचे केवळ अंधानुकरण न करता, मराठी वाचकांच्या अपेक्षा आणि गरजा विचारात घेतल्या. “रोहिणी’ या मासिकाचे माटे हे पहिले संपादक. वैज्ञानिक ज्ञानाचे आणि विज्ञान प्रसाराचे महत्त्व जाणून त्यांनी विज्ञानबोध संपादिला, विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी 200 पानांची विस्तृत पुस्तकरूप प्रस्तावना लिहिली. विज्ञानयुगाकडे पाहण्याचा वैचारिक दृष्टिकोन या प्रस्तावनेत विस्तृतपणे मांडला.
“अस्पृश्यांचा प्रश्न’ हा त्यांचा ग्रंथ लिहिण्यापूर्वी अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी अनेक वर्षे तळमळीने केले होते. हे काम करीत असताना आलेल्या अनुभवांतून स्वतःचे चिंतन केल्यानंतरच या ग्रंथाच्या लेखनाला त्यांनी आरंभ केला. जातिसंस्था व अस्पृश्यता यांच्या बुडाशी वंशविषयक भिन्नत्वाची जाणीव आहे, त्रिवर्णांना ती प्रबल वाटल्यामुळे त्यांनी संकर होऊ न देण्याची व्यवस्था केली.
वंशजपणुकीची भावना सार्वत्रिकही आहे परंतु सर्व भोक्तृत्वे त्रैवर्णिकांनीच भोगायची, इतरांनी त्यांचे दास व्हावयाचे आणि सर्व हलकीसलकी कामे करायची हा अन्याय होय, असे परखड प्रतिपादन त्यांनी या ग्रंथात केले.
भाषेचा जन्म आणि विकास कसा झाला, याचे विवेचन त्यांनी “रसवंतीची जन्मकथा’ या त्यांच्या ग्रंथात, उत्क्रांतितत्त्वाच्या आधारे केले आहे. काव्य म्हणजे गेय वाक्यरचना, ही काव्याची एक नवी व्याख्याही या ग्रंथात त्यांनी मांडली. वर्ष 1957 मध्ये “संत-पंत-तंत’ या पुस्तकात संतकवी, पंडितकवी आणि शाहीर यांच्या काव्याचा परामर्श त्यांनी घेतला.
“परशुरामचरित्र’, “गीतातत्त्वविमर्श’, “रामदासांचे प्रपंचविज्ञान’, हे त्यांचे ग्रंथही त्यांच्या मूलगामी विचारपद्धतीचे व स्वतंत्र प्रज्ञेने निदर्शक आहेत. माटे यांचा पिंड समाजशास्त्रज्ञाचा असल्यामुळे त्यांचे महत्त्वाचे वैचारिक लेखन चिंतनशील झाले आहे.
अत्रे-माटे वाद हा एके काळी पुण्यात चर्चेचा विषय असायचा. तो इतका टोकाला जायचा की लोकांना वाटायचे हे दोघे एकमेकांचे तोंडही पाहात नसतील, पण बापूसाहेब माट्यांच्या वडीलकीचा मान राखून आचार्य अत्रे त्यांच्यासमोर नतमस्तक झाले होते. 25 डिसेंबर 1957 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.