– माधव विद्वांस
दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेचे निर्माते पद्मश्री रामानंद सागर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म लाहोर जवळील गुरुके येथे 29 डिसेंबर 1917 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव चंद्रमौली चोप्रा. त्यांना त्यांच्या आजीने दत्तक घेतले व त्यांचे नाव रामानंद सागर असे बदलण्यात आले.त्यांनी शिक्षण चालू असताना दिवसा शिपाई, ट्रक क्लीनर, साबण विक्रेता, सोनार अशी अनेक कामे केली. त्यांनी पंजाब विद्यापीठातून संस्कृत आणि पर्शियनमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. ते दैनिक मिलाप या वृत्तपत्राचे संपादकही होते.
त्यांनी रामानंद चोप्रा, रामानंद बेदी आणि रामानंद काश्मिरी या नावांनी अनेक लघुकथा, कादंबरी, कविता, नाटके इत्यादी लेखन केले. त्यांनी 1942च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यावेळी त्यांना क्षयरोगाची लागण झाली. त्यांनी त्यांच्या लढ्याबद्दल टी.बी. पेशंटची डायरी हा अदब-ए-मश्रिक या मासिकात स्तंभ लिहिला होता.
त्यांनी वर्ष 1932 मधे, फिल्मी करिअरची सुरुवात क्लॅपर बॉय म्हणून रायडर्स ऑफ द रेल रोड या मूकपटातून केली. त्यांनी लाहोरमध्ये वर्ष 1940 मधे पृथ्वी थिएटर्समध्ये सहाय्यक रंगमंच व्यवस्थापक म्हणून काम केले. तसेच त्यांनी काही नाटकांचे दिग्दर्शनही केले. वर्ष 1944 मध्ये, फिल्म कंपनी शोरी पिक्चर्सद्वारे प्रदर्शित झालेल्या कोयल या पंजाबी चित्रपटामध्ये त्यांनी प्रथम अभिनय केला.
1949 मध्ये ते मुंबईत आले. त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या इतर चित्रपटांसोबतच, राज कपूरच्या ‘बरसात’साठी पटकथा लिहिली. त्यांनी बाजूबंद आणि मेहमान सारख्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यानंतर बॉलीवूडमधील अयशस्वी कारकिर्दीमुळे चेन्नई (मद्रास) येथे गेले आणि जेमिनी स्टुडिओसाठी काम करू लागले. त्यांनी इन्सानियत, राजतिलक आणि पैगाम यासारख्या चित्रपटांची कथा लिहिली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन जेमिनीचे मालक एस. एस. वासन यांनी सागर यांना दिग्दर्शक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी ‘घुंगट’ आणि ‘जिंदगी’ दिग्दर्शित केले.
या चिटपटांच्या यशाने ते पुन्हा मुंबईला आले आणि चित्रपट निर्मिती करण्याचे ठरविले.त्यांच्या प्रॉडक्शन हाउसचे नाव ‘सागर फिल्म्स’ असे ठेवले. सागर आर्ट्स बॅनरखाली ‘आरजू’ हा पहिला चित्रपट होता, जो यशस्वी ठरला. वर्ष 1968 मध्ये धर्मेंद्र आणि माला सिन्हा यांच्यावरील रहस्यमय चित्रपट ‘आँखे’साठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. वर्ष 1976 मध्ये त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची भूमिका असलेल्या ‘चरस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. वर्ष 1979 मध्ये राजेश खन्ना, रेखा आणि मौसमी चॅटर्जी यांची भूमिका असलेला ‘प्रेम बंधन’ हा चित्रपटही यशस्वी ठरला.
त्यांची ‘रामायण’ ही 78 भागांची मालिका त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू ठरली. त्याचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती त्यांनी स्वतः केले होते. ही मालिका 25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 या काळात रविवारी सकाळी 9.30 वाजता दूरदर्शनवर प्रसारित झाली. त्यावेळी रस्ते ओस पडायचे. त्यांचे 12 डिसेंबर 2005 रोजी निधन झाले.