– माधव विद्वांस
सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1928 रोजी मुंबई येथे झाला. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात ज्या नर्तकांनी भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीचा अभ्यास व प्रसार केला, त्यामधे दमयंती जोशी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. रोहिणी भाटे, मोहनराव कल्याणपूरकर, पार्वतीकुमार (ऊर्फ जगन्नाथ महादेव कांबळी), सुरेंद्र वडगावकर यांच्याबरोबरच दमयंती जोशी यांचेही नाव घेतले जाते. नर्तकी दमयंती जोशी यांनी प्रख्यात नृत्यगुरू लीला सोखे (रॉय) तथा मनेका यांच्याकडे कथ्थकचा अभ्यास केला. त्या जनरल डॉ. साहिब सिंग सोखे आणि त्यांची पत्नी लीला सोखे (मनेका रॉय) यांच्या घरातच वाढल्या.
दमयंती यांच्या मातोश्री वत्सला जोशी या मनेका यांच्याकडे काम करायच्या. मनेका यांचे स्वतःचे मूल दगावले होते म्हणून त्यांनी दमयंती यांना दत्तक घ्यायचा विचार केला होता; परंतु दमयंती यांच्या आईंनी त्यास विरोध केला. अखेर मनेका व वत्सला यांनी दमयंती यांचे संयुक्त पालक होण्याचे मान्य केले. मनेका यांची स्वतःची नृत्यशाळा होती. तेथे दमयंती यांनी पं. सीताराम प्रसाद यांच्याकडून कथ्थकचे धडे घेतले.
त्या मुंबईच्या श्री राजराजेश्वरी भरत नाट्य कला मंदिरातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. तेथे त्या टी. के. महालिंगम पिल्लई यांच्याकडून भरतनाट्यमही शिकल्या. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी मेनका यांच्यासमवेत युरोपातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आपले नृत्य सादर केले. वर्ष 1950 च्या दशकाच्या मध्यानंतर त्यांनी लखनौ घराण्याचे पं. अच्छन महाराज, लच्छू महाराज आणि जयपूर घराण्याचे गुरू हिरालाल यांच्याकडून तसेच कथ्थक केंद्र, दिल्ली येथे त्यांनी शंभू महाराजांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले व एक यशस्वी एकल कथ्थक नृत्यांगना म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. विशेषतः कथ्थक नृत्यात साडी नेसून नृत्य सादर करणाऱ्या त्या पहिल्या नर्तिका होत.
त्यांनी लखनौमधील इंदिरा कला विद्यापीठ, खैरागड आणि कथ्थक केंद्रातही कथ्थक शिकवले. दमयंती जोशी यांनी परदेशातही अनेक नृत्य सादर केले आहेत. त्या चीन आणि जपानमधील भारतीय सांस्कृतिक शिष्टमंडळाच्या सदस्या होत्या. दमयंती जोशी यांना दिखाऊपणा फारसा आवडत नव्हता. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. वर्ष 1936 साली बर्लिन येथे झालेल्या डान्स ऑलिम्पियाडमध्ये नृत्यासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनने वर्ष 1971 मध्ये त्यांच्या कथ्थकवरील कार्याचा माहितीपट प्रसारित केला. तसेच हुकुमत सरीन दिग्दर्शित दमयंती जोशी नावाचा आणखी एक चित्रपट 1973 मधे प्रदर्शित झाला.
त्यांना वर्ष 1968 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच भारत सरकारकडून वर्ष 1970 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याने त्या आजारी होत्या आणि जवळजवळ एक वर्ष अंथरुणाला खिळल्या होत्या.त्यातच त्यांचे 19 सप्टेंबर 2004 रोजी मुंबईत निधन झाले. पं. बिरेश्वर गौतम हे त्यांचे एक विश्वासू विद्यार्थी होते. त्यांनी दमयंती यांची अखेरपर्यंत काळजी घेतली होती.