वडगाव मावळ – पवन मावळातील पवना नदीवरील कडधे व थूगाव येथील पूल नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन करून कामास सुरुवात झाली. मात्र, अद्यापपर्यंत पुलांचे कामे पूर्ण झाले नाही. त्यामुळे यावर्षी देखील पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
पवन मावळातील पवना नदीवरील थूगाव व कडधे या ठिकाणचे पूल धोकादायक झाले होते. नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून या दोन्ही पुलांच्या कामासाठी प्रत्येकी सुमारे 15 कोटी 82 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार 30 नोव्हेंबर 2021 रोजी भूमिपूजन करून या पुलांच्या कामास सुरुवात करण्यात आली. या दोन्ही ठिकाणचे पूल बांधताना जुने पूल पाडून नवीन पुलांच्या बांधकामास सुरवात करण्यात आली. यामुळे या भागातील लोकांना जाण्यासाठी नदीत भराव करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, हा मार्ग केवळ उन्हाळ्यापुरताच होता. पावसाळ्यात हा पर्यायी मार्ग बंद करण्यात आल्याने या भागातील लोकांची कोंडी झाली आहे. पूल नसल्यामुळे या भागातील नागरिकांना सुमारे 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. पण नवीन पूल झाल्यावर ही समस्या कायमची संपेल या आशेने नागरिकांनी गैरसोयीचा सामना देखील केला. मात्र, या वर्षी देखील या पुलांचे कामे पूर्ण झाले नसल्याने मागील वर्षीप्रमाणेच पवन मावळातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
यावर्षी काम पूर्ण होईल. मात्र सद्यास्थितीत पुलाचे 70 टक्के देखील काम पूर्ण झालेले दिसून येत नाही. लवकरात लवकर काम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात येईल.
– अशोक शेटे, अभियंता, पाटबंधारे विभाग.
अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका
या दोन्ही पुलांचे कामे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत करण्यात येत आहे. या विभागाकडून या कामासाठी ठेकेदार नेमण्यात आले आहेत. या पुलांचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी ठेकेदारांवर कोणतीच कारवाई करताना दिसून येत नाहीत. यामुळे या पुलांचे कामे होणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आंदरमावळला जोडणाऱ्या टाकवे पुलाचे काम अर्धवट
वडगाव मावळ -पावसाळा आला तरी आंदर मावळातील गावांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील टाकवे येथील नवीन पुलाचे काम पूर्ण झाले नाही. यावर्षी देखील पावसाळ्यात आंदरमावळातील गावांचा संपर्क तुडण्याची शक्यता आहे. आंदरमावळला जोडणारा इंद्रयाणी नदीवरील टाकवे येथील जुना पूल धोकादायक झाला होता. तसेच या पुलाची उंची देखील कमी असल्याने हा पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या काम दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता खोत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून पुलाचे जोड रस्ते बनविण्यासाठी जागेचे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील काम करण्यात येईल.