देहरादुन – उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीत 8 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. उत्तरकाशीतील अनेक गावांना ढगफुटीचा फटका बसला असून पुरस्थिती गंभीर झाली आहे.
उत्तराखंडमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने अरकोटी, मकुरी आणि तिकोची गावे पाण्याखाली गेली आहेत. या गावांमधील अनेक घरे वाहून गेली असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
राज्य आपत्ती पथकांनी (एसडीआरएफ) बाधित भागात त्वरित दाखल करण्यात आले आहे. परंतु संततधार पावसामुळे बचावकार्य अडचणीत येत आहेत. उत्तरकाशीचे जिल्हादंडाधिकारी आशिष चौहान हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी पुरग्रस्त गावांसाठी रवाना झाले आहेत.
या पावसाचा चारधाम यात्रेलाही फटका बसला असून मार्गावर भूस्खलन झाल्याने अनेक यात्रेकरू रस्त्यातच अडकून पडले आहेत. तसेच षीकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महार्माग, केदारनाथ हायवे, यमुनेत्री महामार्ग ठप्प झाले आहेत.