लखनौ – विवाह करून सक्तीने धर्मांतराला भाग पाडण्याचा प्रकार बंद करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने एक नवीन अध्यादेश जारी केला असून त्या अध्यादेशाला उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी दिली आहे.
बेकायदेशीर धर्मांतर विरोधी कायदा या नावाने हा अध्यादेश लागू करण्यात आला आहे. या प्रकारांना भाजप नेत्याकंडून लव्ह जिहाद हा शब्दप्रयोग वापरला जात आहे.
गेल्याच आठवड्यात राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली होती.उत्तरप्रदेशात अनेक मुस्लिम युवक हिंदु तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लग्न करण्यास बाध्य करतात आणि नंतर या मुलींचे सक्तीने धर्मांतरण केले जाते असा या सरकारचा दावा आहे.
असा प्रकार करणाऱ्यांना यापुढे दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा केली जाणार आहे. मुलींचे सक्तीने धर्मांतर केले तर असा विवाह त्वरीत रद्दही समजला जाणार आहे. लग्नानंतर ज्यांना धर्म बदलायचा आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अनुमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हरियाना आणि मध्यप्रदेश या भाजप शासित राज्यांनीही असे कायदे करण्याचे योजले आहे. तथपि अध्यादेशाद्वारे हा कायदा लागू करणारे उत्तप्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे.