जयेश राणे
ज्यांचे विचार पटत नाही, त्यांचे विचार सोशल मीडियावर खोडून काढले जातात. अर्थातच घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र ते स्वातंत्र्य योग्य प्रकारे उपयोगात आणले पाहिजे. याकडे दुर्लक्ष करून स्वतःला वाटते तसेच चालू ठेवले जात आहे. म्हणजे वैचारिक पातळी सोडून अर्वाच्च, अभद्र भाषेचा उपयोग करून टीका करण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
समोरील व्यक्ती अयोग्य गोष्टींचे समर्थन करत असली तरी तिच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करणारे महाभाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर आहेत. यामध्ये पुरुष वर्गासह स्त्री वर्गाचाही सहभाग लक्षवेधी आहे. प्रोफाइलमध्ये उच्च शिक्षणाचे, अमूक ठिकाणी चाकरी करत असल्याचे, इतक्या वर्षांचा कामाचा अनुभव वगैरे बरीच शेखी मिरवलेली असते. मात्र त्यांना न पटणाऱ्या व्यक्तीच्या विचारांपेक्षा त्या व्यक्तीवरच वैयक्तिक टीका करण्याचा किळसवाणा प्रकार पाहण्यास मिळतो. उद्या असे पुरुष, स्त्रिया स्वतःच्या मुलांना काय दिशा देणार?
म्हणजे उच्च शिक्षित असूनही ही मंडळी अर्वाच्च भाषेचा उपयोग करतात, तर आपणही त्यांच्या पावलावर पाऊल टाकले तर बिघडले कुठे? या गोड गैरसमजात राहून त्याप्रमाणे कृती करणारे नव्याने सिद्ध होत नसतील? हे कशावरून. गलिच्छ भाषेचा उपयोग करून टीका, टिप्पणी केल्याने संबंधित व्यक्तीत पालट होईल, अशी व्यर्थ अपेक्षा ठेवून अनावश्यक फाजीलपणा करण्यात वेळ वाया घालवला जात आहेच, तसेच वैचारिक प्रदूषणही केले जात आहे.
दुसरे सूत्र असे की, अर्वाच्च भाषेत टीका करणारे आमचे आदर्श अमूक आहेत, असेही सांगायला विसरत नाहीत. असे आहे तर त्या आदर्शापासून काहीच बोध न घेतल्याने टीका करताना ती कशी केली पाहिजे, याची साधी समजही त्यांच्या बुद्धीला नाही आणि म्हणे आमचे आदर्श अमूक आहेत. आदर्श 100 टक्के योग्य असले तरी त्याप्रमाणे वागणारे योग्य नसतील, तर त्यामध्ये त्या आदर्श व्यक्तीकडे आपल्यामुळे बोट दाखवले जात आहे. याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. उलटपक्षी असे म्हटले पाहिजे की अमूक आदर्श सांगणाऱ्या व्यक्ती टीका करताना चुकूनही अयोग्य भाषेचा उपयोग करत नाहीत.
देश, समाज यासाठी अतुलनीय सेवाभावी कार्य केलेल्या व्यक्तीनी शिव्या, अर्वाच्च, अश्लील भाषेचा उपयोग करून टीका केल्याचे ऐकिवात, वाचनात नाही. असे असताना केवळ दिखावा करण्यासाठी आदर्श व्यक्तींच्या नावांची ढाल बनवायची आणि टीका करताना मात्र सडकछाप, टपोरी भाषा वापरायची म्हणजे खरे आदर्श नक्की कोणते समजायचे? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. विचारांचा प्रतिवाद योग्य विचारांनी न करता अयोग्य भाषेच्या कुबड्यांचा उपयोग करून स्वतःचीच वैचारिक हानी करून घेतली जात आहे. यात तिळमात्रही शंका नाही.
एखाद्याचा विचार खोडून काढायचा आहे, तर त्या विचाराशी निगडीत सूत्रांचा उपयोग करून त्याने मांडलेला विचार कसा चुकीचा आहे. या पद्धतीचा उपयोग नक्कीच केला जाऊ शकतो. मात्र अर्वाच्च, अश्लील शेरेबाजी करून त्यातून विकृत समाधान मिळवणारे कधीच समाज जागृतीसाठी उपयुक्त ठरू शकत नाहीत. मग तो पुरुष असो अथवा स्त्री. हे परखड सत्य कोणाला लागण्याचे कारणच नाही. कारण हे सर्व अनुभवाचे बोल आहेत.
आपण त्या देशातून आहोत, जो एकेकाळी विश्वगुरू असल्याचे म्हटले जाते. महासत्ता असणे आणि विश्वगुरू असणे यात पुष्कळ अंतर आहे. दोन्ही सूत्र पूर्णपणे भिन्न आहेत. एक मात्र आवर्जून सांगता येईल की, महासत्तेपेक्षा विश्वगुरू नक्कीच बलशाली आहे. विश्वगुरू असणाऱ्या या देशाने जगाला विविध गोष्टींचे ज्ञान दिले आहे. ज्ञानाचे केंद्रच भारत असल्याने जगाचे लक्ष येथेच केंद्रित होते. अशा देशाच्या मातीत जन्मलेल्या अनेक रत्नांनी, लढवैया बाण्याच्या स्त्रियांनी शत्रूला जेरीस आणले. “बुधभूषण’ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज मराठी, संस्कृत भाषेचे पंडित होते. अवघ्या जगाला साधी राहणी, उच्च विचार कसे असावेत हे तेजस्वी वाणीतून दाखवून देणारे स्वामी विवेकानंद. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक यांसारखे भाषा प्रभू आपल्याला लाभलेले आहेत.
इंग्रजांचा कितीही राग आला तरी योग्य भाषेचा उपयोग करून चपखलपणे त्यांची खोड मोडणारे ते विलक्षण भाषाप्रेमी होते. अशी उदाहरणे आहेत. असे असताना आपण कोणत्या अर्वाच्च शब्दांचा उपयोग करून समोरच्यावर टीका करत आहोत. याचा विचार करण्यासाठी बुद्धीवर ताण दिला, तर नक्कीच चांगले होणार आहे. शिव्यांच्या भाषेचा उपयोग करणाऱ्यांनी मांडलेला दृष्टिकोन योग्य असला तरी भाषाच अयोग्य असल्याने दृष्टिकोणाचा उपयोग होत नाही.