अरुण गोखले
आमच्या परिसरात श्री समर्थ रामदासस्वामी ह्यांच्या पादुकांचे आगमन झाले होते. मंदिरात विसावलेच्या श्री समर्थ चरण पादुकांच्या दर्शनाचा लाभही लोकांना झाला. त्याच वेळी उद्या सकाळी ह्या भागात समर्थ सेवकांची भिक्षा फेरी होणार आहे अशी सूचनाही सर्वांना दिली गेली.
त्यानुसार आम्ही तांदूळ, डाळ आणि दक्षिणा काढून तयार ठेवली. मी घरच्या लोकांना ते समर्थांचे लोक आले की न विसरता भिक्षा द्या, असे सांगितलेही. कसल्याशा अति महत्त्वाच्या कामासाठी नेमके त्याच वेळी मला घराबाहेर जावे लागले. मी परत येऊन पाहतो तर काय! सर्व वस्तू तशाच. हे काय! समर्थांच्या लोकांना भिक्षा दिली नाहीत? मी विचारले.
त्यावर मुलगी म्हणाली, “”अहो बाबा! ते लोक कधी आले आणि गेले ते कळले सुद्धा नाही. ते दाराशी थांबले नाहीत त्यांनी हाका मारल्या नाहीत. ते आपले आले श्लोकांचे पठण केले अन् गेलेही. ही काय पद्धत झाली का?”
त्यावर मी काही तिला सांगायच्या आधीच तिची आजी तिला म्हणाली, “”बाळ, हे लोक आपल्याकडून भिक्षेची अपेक्षा करतात. त्यांना भीक नको असते.”
“”म्हणजे काय भीक आणि भिक्षा दोन्हींचा अर्थ सारखाच ना?” तिने तिची शंका बोलून दाखविली.
तेव्हा नीट समजावीत आजी म्हणाली, “”अगं हे दोन्ही शब्द जरी वरवर सारख्याच अर्थाचे आहेत असे आपल्याला वाटत असले ना? तरी त्यात फार मोठा फरक आहे. या दोन्ही प्रकारात मागणी आहे हे खरे, पण भीक म्हणून जी मागणी केली जाते त्यात याचना, लाचारी, अधिकची अपेक्षा असते. पण भिक्षेत तसे नाही, ती याचना नाही तर आपल्या हाताला दानाची सवय व्हावी यासाठी केलेले एक आवाहन असते. त्यात संग्रह, स्वार्थ, लोभ अधिकाची अपेक्षा नसते.”
आजी पुढे म्हणाल्या की, “”दुसरे असे की जे भीक मागायला येतात ना ते असतात भिकारी. तर जे भिक्षा मागायला येतात ना ते असतात सेवेकरी. समर्थांनी आपल्या सेवेकऱ्याना हे सांगून ठेवले होते की तुम्ही दारापुढे जा. श्लोक म्हणा तो श्लोक संपेपर्यंत दात्याने त्याच्या दातृत्वाने काही आणून दिले तर ते घ्या अन्यथा पुढे व्हा. कोणाच्याही दारात याचना करीत उभे राहू नका.” आजीचा तो खुलासा नाती बरोबरच मलाही त्या दोन सारख्याच शब्दांचा खूप वेगळा अर्थ सांगून गेला.