मुंबई – सध्या देशातील विविध राज्यांमध्ये, अगदी आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरांमधून डोळ्यांच्या फ्लूचा म्हणजे ‘डोळे येणे’ हा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. डोळ्याच्या फ्लूला ‘कॉंजक्टिव्हायटिस’ किंवा ‘पिंक आईज प्रॉब्लेम’ असेही म्हणतात. डोळ्यांना होणारा हा संसर्ग जिवाणू किंवा विषाणूजन्य अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो.
पावसाळा सुरु झाला की वातावरणात खूप बदल होताना दिसतात. हवेतील दमटपणा हे वातावरणात संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. थंडी -ताप, खोकला असे अनेक आजारांची साथ सुरु होते. त्याचबरोबर या दिवसात डोळे येण्याची साथ देखील पसरते. घरात एकाला डोळे आले तर संपूर्ण घरातल्या लोकांना हे इन्फेकशन होण्यास वेळ लागत नाही,
तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात हा आजार पसरतो. पावसाळ्यात कमी तापमान आणि आर्द्रतेमुळे जीवाणू, विषाणू आणि ऍलर्जीक घटकांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि कंजंक्टिवायटिस सारखे संक्रमण होते. त्यामुळे आपण स्वतः आणि आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांची कश्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबद्दल खाली सांगण्यात आले आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांना डोळ्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी काय करता येईल?
1. मुलांचा गणवेश स्वच्छ असावा.
2. मुलांना वारंवार डोळ्यांचा स्पर्श करण्यास मनाई करा.
3. मुलांना वारंवार हात धुण्यास सांगा.
4. ते शक्या नसेल तर, मुलांच्या बॅगेत सॅनिटायझर ठेवा आणि ते वापरायला सांगा.
5. शाळेतून आल्यावर मुलांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.
6. स्वच्छ हाताने डोळे पाण्याने धुवा.
7. संक्रमित व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांपासून मुलांना दूर ठेवा.
8. मुलांना योग्य प्रमाणात पाणी पिण्यास सांगा.
स्वत: औषधोपचार करू नका :
जर तुम्हाला डोळ्याच्या फ्लूची लक्षणे दिसत असतील तर त्याबद्दल तज्ञांशी संपर्क साधा आणि उपचार करा. कोणतीही ओव्हर द काउंटर औषधे किंवा आयड्रॉप स्वतः वापरू नका कारण ते तुमचा धोका वाढवू शकतात. डोळ्यांच्या इतर अनेक समस्यांमध्ये आय फ्लू सारखीच लक्षणे असू शकतात, त्यामुळे लक्षणांचे नेमके कारण शोधून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे.