नवी दिल्ली – ‘वीर जरा’, ‘रिफ्युजी’, ‘गदर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या तरुणांमधील प्रेमकथा आपण पाहिल्या आणि अनेकांना त्या आवडल्या देखील. पण सध्या भारतात अशाच दोन रिअल लाईफ लव्ह स्टोरीजची चर्चा आहे. पहिली म्हणजे सीमा हैदर जिने पाकिस्तानची सीमा ओलांडली आणि सचिन मीनासाठी भारतात पोहोचली. तशीच आणखी एक कहाणी अंजूची आहे जी तिचे प्रेम मिळवण्यासाठी भारतातून पाकिस्तानात पळून गेली आहे. आता या दोन्ही कथांवर चित्रपट बनणार आहेत. निर्माते अमित जानी हे दोन्ही चित्रपट बनवणार आहेत. याच अमित जानीने सीमा हैदरला आगामी चित्रपटात रॉ एजंटची भूमिका दिली आहे.
अमित जानी यांची निर्मिती कंपनी जानी फायरफॉक्स फिल्म प्रोडक्शनने आगामी तीन चित्रपटांसाठी नावे बुक केली आहेत. ज्यामध्ये सीमा हैदर आणि सचिनच्या आयुष्यावर बनलेल्या चित्रपटाचे नाव ‘कराची ते नोएडा’ असे असेल. ‘मेरा अब्दुल ऐसा नहीं है’ हा चित्रपट अंजूच्या जीवनावर बनवला जाणार आहे. याशिवाय पालघरमधील साधूंच्या हत्येवर ‘मोबलिचिंग’ नावाने त्यांनी टायटल रजिस्टर केल्याचे समजते.
अमित जानी यांनी सांगितले की, त्यांना तीन वेळा धमक्या आल्या आहेत. ते म्हणाले की, मी १०० कोटी कमवण्यासाठी नाही तर १०० कोटी लोकांना जागवण्यासाठी चित्रपट बनवत आहे. चित्रपट बनवण्याबाबत ते म्हणाले की, आपण आपला देश, धर्म आणि न्यायासाठी चित्रपट बनवत राहू.
अ टेलर मर्डर स्टोरीसोबतच सीमाला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित ‘कराची ते नोएडा’ मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच चित्रपटाबाबत दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाचे थीम साँग लाँच होणार आहे.