महामार्गालगतचा कचरा ग्रामपंचायत प्रशासनाने उचलला
उरुळी कांचन – ‘उरुळीत कचरा प्रश्न गंभीर’ या मथळ्याखाली गुरूवारी (दि. 24) दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले. गावासह महामार्गालगतचा कचरा उचलण्यास सुरुवात करण्यात आली असल्याने परिसर चकाचक झाला आहे. नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गालगत कचऱ्याचे ढीग साचले होते. कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर लावली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
उरुळी कांचन येथे प्लॅस्टिक बंदीकरिता अनेक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्या कारवाईनंतरही प्लॅस्टिक कचरा कमी झालेला नव्हता. याउलट कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण वाढतेच होते. यातून कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. महामार्गालगत जागोजागी कचरा साचत होता. यातून संपूर्ण उरुळी कांचन गावच विद्रूप दिसत होते.
तसेच, महामार्गालगत कचरा साचल्याने अस्वच्छ गाव, अशी उरुळीची प्रतिमा प्रवशांत तयार होऊ लागली होती. यापार्श्वभूमीवर प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर याची तातडीने दखल घेत ग्रामपंचायत प्रशासानाने गावासह महामार्गालगतचा कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे.कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत विचार करीत आहे.
सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे गावातील कचऱ्याकडे दुर्लक्ष झाले होते. “प्रभात’मध्ये वृत्त प्रसारित होताच गावातील संपूर्ण कचरा उचलण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण गावातील कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे.
– एन. के. धापटे, प्रशासक उरुळी कांचन