नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्ष “निर्नायकी’ असल्याचा भ्रम जनतेमधून दूर करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला तातडीने पूर्णवेळ अध्यक्ष मिळायला हवा, अशी अपेक्षा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून बेमुदत जबाबदारी पेलण्याची अपेक्षा करणेच चूक आहे. त्यासाठी कॉंग्रेस पक्षासाठी पूर्णवेळ अध्यक्ष शोधण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून जबादारी सोनिया गांधी यांनी स्वीकारल्याला 10 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभुमीवर थरूर यांच्या या अपेक्षेला महत्व प्राप्त होत आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा मार्गी लावणे गरजेचे आहे. सोनिया गांधींनी हंगामी अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी जबाबदारी स्वीकारण्याचे मी स्वागतच केले होते. मात्र त्यांनी या जबाबदारीचे ओझे बेमुदत पेलणे अशी अपेक्षा करणे चूक आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची धमक, क्षमता आणि गुणवत्ता निश्चितच आहे. मात्र जर त्यांना पुन्हा अध्यक्ष व्हायचे नसेल तर पक्षाने नवीन अध्यक्षाची निवड करायला पाहिजे, असे थरूर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या दारुग्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. पण त्यांनी सोडलेल्या पदावर परत यावे अशी कॉंग्रेसमधील एका गटाने मागणी करायला सुरुवात केली आहे, 23 जूनला झालेली कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक, 11 जुलै रोजी सोनिया गांधींनी नवनिर्वाचित कॉंग्रेस खासदारांबरोबरच्या चर्चेसाठी बोलावलेली बैठक आणि 30 जुलै रोजी राज्यसभेच्या खासदारांबरोबर सोनिया गांधींनी केलेल्या चर्चेच्यावेळी ही मागणी करण्यात आली होती.
पक्षातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ नेत्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारायला हवे, कारण दोन्ही गटांमध्ये पक्षाच्या नेतृत्वावरून आणि पक्षातील त्यांच्या भवितव्यावरून अस्वस्थता आहे. कोविड-19 आणि चीनची घुसखोरी आदी मुद्दयांवरून सरकारला घेरण्याचे काम राहुल गांधींनी एकहाती उत्तमपणे पार पाडले आहे, याचीही आठवण थरूर यांनी करून दिली.