नाशिक – कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर त्याला कष्टाशिवाय पर्याय नसतोच आणि जर तुम्ही कष्ट प्रामाणिक केलेले असतील यश मिळाल्याशिवाय राहत नाही याचे उत्तम उदाहरण या प्रेरणादायी कथेतून आपल्याला मिळणार आहे.सध्या संपूर्ण देशात ‘बेरोजगारी’ या विषयाकडे एक गंभीर समस्या म्हणून पहिले जात आहे.
पदवी,पदव्युत्तर शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही या मुळे अनेक तरुण तरुणी डिप्रेशन मध्ये जाताना दिसतात .तर काही जण येईल ते काम हाताशी धरून आपला उदरनिर्वाह चालवत असतात.या सर्व समस्यांवर मात करत एका तरुणाने नोकरी मिळत नाही म्हणून निराश न होता स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथील संदीप कचरे या युवकाने शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीएड केले होते.
त्याने डी.एड चे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर शिक्षक भरतीची वाट पाहू लागला.एक वर्ष,दोन वर्ष असे करत करत जवळपास १० वर्षे उलटून गेली तरी शिक्षक भरती झाली नाही. म्हणून त्याने ‘कुक्कुटपालन’ हा व्यवसाय सूरु करण्याचा निर्णय घेतला.कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग न घेता त्याने स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय सुरू केला आणि यशस्वी होऊन दाखवले आहे.
संदीप दोन वर्षापासून कुक्कुटपालन व्यवसाय करत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. संदीपने 100 कोंबड्यांच्या पिल्लांपासून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. सध्या त्याच्याकडे अडीच ते तीन हजार कोंबड्या आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न त्याला प्राप्त होत आहे.
संदीपचा तरुणांना संदेश –
सुशिक्षित बेरोजगारांनी हार न मानता आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा उपयोग व्यवसायामध्ये दाखवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धाडस करावे. आपल्या मदतीला कोणी येणार नाही. आपले प्रयत्न आपल्यालाच करायचे आहेत.एवढा निश्चय मनाशी ठरवून कामाला लागा असा संदेश संदीपने तरुणांना दिला आहे.