Parliament – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी गुरुवारी कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दिवसभरात अनेकवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
कालच्या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे. अध्यक्षांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. संसदेत प्रवेश करण्यासाठी आम्ही कोणाला पास देतो याची काळजी घेतली पाहिजे.
गोंधळाचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा लोकांना पास देऊ नयेत, याची काळजी खासदारांना घ्यावी लागणार आहे. भविष्यात सर्व खबरदारी घेतली जाईल.
– राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री
हा केवळ लोकसभा आणि राज्यसभेचा प्रश्न नाही. एवढा कडेकोट बंदोबस्त असतानाही दोन जणांनी आत येऊन सुरक्षेचा भंग कसा केला? त्यांना नेमके कोणी पाठबळ दिले याची पारदर्शक चौकशी व्हायला हवी.
– मल्लिकर्जून खर्गे, काँग्रेस अध्यक्ष
विरोधी पक्ष राष्ट्रपतींना भेटणार
इंडिया आघाडीचे नेते संसदेतील सुरक्षेतील त्रुटींबाबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींकडे भेटीची वेळ मागितली आहे.
या मुद्द्यावर दोन्ही सभागृहांत विरोधी पक्ष अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. यासह संसदेच्या सुरक्षेबाबत मंगळवारी काँग्रेसने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे.