खालापूर, (प्रतिनिधी) – येणाऱ्या लोकसभा निवडणुकित महाराष्ट्रात गद्दारांना गाडून, महाराष्ट्र गद्दार मुक्त व भाजप मुक्त करण्याचा शिवधनुष्य महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व तमाम नागरिकांनी उचलला आहे. या लढाईत शिवसैनिक सर्वांत अग्रभागी राहतील. आम्ही चूल पेटविणारे तर भाजप व त्यांचे नेते घरे जळणारे बनले असल्याचा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
जनसंवाद यात्रेनिमित्त खोपोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची जोरदार शक्तिप्रदर्शनाने जाहिर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली.
या वेळी राज्य सभा खासदार व शिवसेना नेते संजय राऊत, माजी मंत्री अनंत गीते, सामाजिक कार्यकर्त्यां तथा भारत जोडो मिहिमेच्या उल्का महाजन, शेकापचे सर्वेसर्वा तथा आमदार जयंत पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे संगटक उमेदवार संजोग वाघेरे पाटील, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जतचे संघटक बाबू घारे, आमदार सचिन अहिर, शिवसेना नेते मिलींद नार्वेकर उपस्थित होत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप भाडोत्री लोकांचा पक्ष आहे. भाजपला गाडून टाका, भाजप जे हिंदुत्व मानते ते हिंदुत्व आम्ही मानत नाहीत. महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. यासाठी या निवडणुकीत आघाडीच्या सर्व घटकांनी एकदिलाने लढाई उभी करा. गद्दारांच्या जीवावर शिवसेना संपविण्याचे कट कारस्थान झाले.
पण जमीन नांगरून पुन्हा नव्याने बहारदार शेती पिकवू व शिवसेना पूर्वीपेक्षा जोमाने ऊभी करू हा भाजप हा भष्ट्राचाऱ्यांचा महामेरू असून, दहा वर्षांच्या सत्ता काळात भाजपच्या खात्यात ७ हजार कोटी व ७० वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षच्या खात्यात फक्त ७०० कोटी आहेत. यावरून देश कोण विकत आहे, गिळंकृत करीत आहे हे स्पष्ट होत आहे.
७० हजार कोटींचा घोटाळा करणारे एका रात्रीत उपमुख्यमंत्री होतात ही मोदी गॅरंटी आहे. ही लढाई मी स्वतःसाठी नाही तर संविधान वाचवण्यासाठी व देश आणि राज्यासाठी लढत आहे. भाजप पुन्हा सत्तेत आली तर ही देशाची शेवटची निवडणूक असणार आहे. त्यामुळे आप की बार भाजप तडीपार हा आमचा नारा आहे.