पुणे – येरवडा येथील ब्लू ग्रास बिझनेस पार्क इमारतीच्या स्लॅब कोसळून झालेला अपघात हा कामातील निष्काळजीपणामुळेच झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. तांत्रिक तथ्य शोध समितीने हा प्राथमिक निष्कर्ष नोंदवला आहे.
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही स्थापन करण्यात आली होती. समितीने घटनास्थळी पाहणी करून प्राथमिक निष्कर्ष अहवाल सादर केला आहे. याबाबत समितीचे सदस्य सुधीर कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अहवालाबाबत भूमिका मांडण्यासाठी प्रकल्पाचे विकसक, साइट इंजिनिअर, आर्किटेक्ट तसेच स्ट्रक्चरल इंजिनिअर यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दि.25 फेब्रुवारी रोजी समितीसमोर त्यांनी सुनावणी होणार आहे. त्यानंतर समिती आपला अंतिम अहवाल शासनास सादर करेल.
काय करण्यात आली पाहणी
या समितीमधील प्रत्येक सदस्याने अपघात स्थळाची पाहणी करून स्वतंत्र अहवाल सादर केला आहे. त्यात प्रत्यक्ष घटनास्थळ, महापालिकेची परवानगी तसेच परवानगी मान्यता घेतना दिलेली माहितीची छानणी आणि प्रत्यक्ष ठिकाणाची तपासणी, अपघाताच्या ठिकाणच्या सुरक्षा उपाययोजना, कामासाठी वापरलेले साहित्य, काम नियमानुसार झाले का, कामाच्या तपासणीसाठी साइट इंजिनिअर अथवा इतर जबाबदार व्यक्ती होत्या का, याची तपासणी करण्यात आली आहे.
या विषयांवर निष्काळजीपणाचा ठपका
या प्रकल्पाच्या राफ्ट फाऊंडेशनचे काम करताना लोखंडी जाळीची ठेवणी व बांधणी योग्य नव्हती.
जाळ्यांमध्ये उभारण्यात आलेल्या घोड्या (चेअर्स) पुरेशा नव्हत्या.
जाळ्यांची बांधणी स्ट्रक्चरल ड्रॉइंगचा योग्य अभ्यास न करता उभारण्यात आली होती.
अपघात राफ्टची बांधकामावेळी तपासणी नव्हती.
बांधकामाकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरक्षा कठडे नव्हते.
वरची आणि खालची जाळी स्थिर ठेवण्यासाठी नियोजन, संकल्पना व कार्यान्वित नव्हती.