इंफाळ – मणिपूरच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचा प्रचार शनिवारी समाप्त झाला. पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 मार्च रोजी होणार आहे. उद्या पहिल्या टप्प्यात 60 पैकी 38 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. तर उर्वरित 22 मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्याचा प्रचार संपत असताना मुख्यमंत्री आणि भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनी इंपाळमधील पतसोई मतदारसंघामध्ये दारोदारी प्रचारावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रचारसभांना संबोधित केले.
भाजपने 2017 साली नॅशनल पीपल्स पार्टी, नागा पीपल्स फ्रंट आणि लोकजनशक्ती पार्टीबरोबर आघाडी करून मणिपूरमध्ये सरकार स्थापन केले होते. मात्र, यावेळी भाजने एकट्यानेच सर्व 60 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसने 6 राजकीय पक्षांबरोबर मिळून मणिपूर प्रोग्रेसिव्ह सेक्युलर अलायन्स नावाने एक महाआघाडी तयार केली आहे. या आघाडीमध्ये कॉंग्रेस व्यतिरिक्त भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक, रिव्हॉल्युशनरी पार्टी आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचा समावेश आहे.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्थानिकांच्या हक्कांचे जतन करणे, दोन जास्तीचे सिलिंडर आणि महाविद्यालयीन युवतींना इलेक्ट्रिक स्कूटी देण्याचे आश्वासन दिले आहे. तर कॉंग्रेसने मणिपूर सांस्कृतिक वैविध्यतेचे धोरण आणण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय बालकांच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार, मणिपूर रेजिमेंटची निर्मिती आणि “ऍफ्स्पा’ कायदा रद्द करण्याची सरकारला विनंती करण्याचेही आश्वासन दिले आहे.
2017 साली मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 28 जागा जिंकून कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या, नॅशनल पीपल्स पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंटने प्रत्येकी 4 जागा जिंकल्या होत्या. लोकजनशक्ती पार्टीला केवळ एका जागी विजय मिळवता आला होता. मात्र, नंतर भाजपने एनपीपी, एनपीएफ आणि एलजेपी बरोबर आघाडी करून बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले होते.