लखनऊ – उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज 61 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे यातील मुख्य मतदारसंघांमध्ये अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, प्रयागराज, अयोध्या आणि गोंडा या जिल्ह्यातील मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यासाठी 692 उमेदवार रिंगणात आहेत.
या टप्प्यातील मतदार संघांमध्ये सिरथू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, रामपूर खासमधून कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा, कुंडा मतदारसंघातून अपक्ष आमदार रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैया हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
यातच आज मतदानाच्या पाचव्या टप्प्यात देखील भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री के. पी. प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांच्या सायकल या चिन्हावरून निशाणा साधला. के. पी. प्रसाद मौर्य म्हणाले,’अखिलेश यादव यांची अहंकरामध्ये उंच उडणारी सायकल १० मार्चला बंगालच्या उपसागरात जाऊन पडणार आहे. त्यांची सायकल आधी सैफईला गेली होती आणि आता ती बंगालच्या उपसागरात जाईल, असं केशव प्रसाद मौर्य म्हणाले.
दरम्यान,दहशतवाद्यांनी सायकलला पसंती दिली आणि बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सायकलचा वापर व्हायचा, असा अजब तर्क पंतप्रधान मोदींनी लावला होता. तेव्हापासून उत्तर प्रदेश निवडणुकीत सायकलवरून राजकारण तापल आहे.