लखनौ – उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. खून करण्यात आलेल्या चौघांमध्ये ५० वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला त्यांची १६ वर्षीय मुलगी व १० वर्षीय मुलाचा समावेश आहे. या दलित कुटुंबाच्या नातेवाईकांनी खुनामागे कथित उच्चवर्णीय समाजातील शेजारी असल्याचा आरोप लगावला आहे. मुलीच्या हत्येपूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचाही संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून ११ जणांविरोधात खून, सामूहिक बलात्काराच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आठ जणांना अटक करण्यात आल्याचे प्रयागराज पोलीस प्रमुखांनी सांगितले.
दरम्यान, या खुनाच्या घटनेनंतर काँग्रेसच्या उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी प्रियंका गांधी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रायाराज येथे पोहचल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना गांधी यांनी, “कुटुंबातील सर्व पुरुष कामासाठी झारखंड येथे असतात. त्यामुळे येथे केवळ महिलाच आहेत. त्या सध्या भीतीच्या सावटाखाली असून पोलीस त्यांना मदत करत नाहीये. त्यांना भीती आहे की कोणीतरी येईल आपली छळवणूक करेल.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून करण्यात आलेल्या चौघांवरही कुऱ्हाडीसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत. मृतांपैकी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका खोलीमध्ये तर इतर तिघांचा मृतदेह अंगणात पडलेला आढळला असेही पोलिसांनी सांगितले.
एका नातेवाईकाने, ‘मृत कुटुंबाचे शेजारील कुटुंबाशी २०१९ पासून जमिनीवरून वाद होते. सप्टेंबरमध्ये या कुटुंबावर प्राणघातक हल्ला देखील करण्यात आला होता. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. तसेच आपापसात मिटवून घेण्याचा तगादा देखील लावला’ असा आरोप लगावला.