मुंबई- देशासह राज्यात गेल्या दीड वर्षांत करोना महामारीमुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत, तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. या निर्णयामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे.
दरम्यान, करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. याने केंद्राला आदेश दिले होते. ही मदत नातेवाईकांच्या थेट बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बॅंक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.