नगर, (प्रतिनिधी) – नगर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. वादळी वार्यास मंगळवार (दि. २७) रोजी सहा वाजण्याच्या सुमारास सुरूवात झाली. त्यानंतर सुमारे अर्धा तास मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, कांदा, गहू पिकाला याचा फटका बसणार असल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. विशेषता गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. तर फळबागांमध्ये आंबा, द्राक्षे या पिकांचे नुकसान झाले. आंब्याला सध्या मोहर आणि कैर्या आल्या आहेत. अवकाळी पावसामुळे या आंबे, द्राक्षांचे नुकसान झाले. आज पुन्ह वादळी वार्यासह झालेल्या या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्षे, संत्रा- मोसंबी या फळबागांचे ही नुकसान होण्याची शक्याता वर्तावली जात आहे.
नगर शहरासह तालुक्यातील काही भागात अवकाळीचा तडाखा बसला. गेल्या दोन दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तावली असून या पावसाने सखल भागात पाणी साचले होते. सध्या ग्रामीण भागात कांदा काढणीचे काम सुरु आहे. त्यात कांद्याला चांगला भाव असल्याने कांदा पीकाकडे लक्ष आहे. मात्र या पावसाने कांद्याच्या गाभ्यात पाणी गेल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.