जळगाव – अज्ञान समाजकंटकांनी उभ्या शेतातील कपाशी उपटून टाकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या माथेफिरुने शेतकऱ्याची तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी उपटून टाकल्यामुळे हाताशे आलेले पिक शेतकऱ्याच्या हातून गेले आहे. हा प्रकार जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात घडला आहे.
मीराबाई उत्तम गायकवाड व सचिन गायकवाड असे या शेतकऱ्यांचे नाव असून ते मळगाव येथील रहिवासी आहेत. मीराबाई यांच्या आईचे शेत तांदुळवाडी शिवारात असून त्या शेताची मशागत ते करतात. मात्र या माशेफिरूंनी त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आहे. त्यामुळे मीराबाईंनी शेतात अश्रू अनावर आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
मीराबाई गायकवाड ह्या आदीवासी समाजातील असून त्यांची आधीच परिस्थीती बेताची आहे. त्यात या घटनेमुळे त्यांनी शेतात जोरजोरात हंबरडा फोडला आहे. या घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्यांनी शेतात धाव घेतली व संताप व्यक्त करत या माथेफिरुंना अटक करण्याची मागणी केली आहे. व शेतकऱ्याला प्रशासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी मागणी केली आहे.