राजेंद्र भुजबळ
शिर्डी – श्री रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल होत आहेत. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास, साईनामाचा गजर करत या पालखीमधील भाविकांना प्रवास मार्गावर पिण्याचे पाणी, अन्नदान, थंडपेय, नाश्ता, चहा, कॉफी देण्याची व्यवस्था शिर्डीतील श्री म्हाळसापती महाराज ट्रस्टने करून अनोख्या सेवेचे दर्शन घडविले.
साईबाबांची खरी ओळख शिर्डीतील श्री खंडोबा मंदिरात झाली. कारण एका लग्नाच्या वऱ्हाडात आलेल्या या तरुणाला आओ साई म्हणून पहिली हाक श्री म्हाळसापती महाराजांनी देत मंदिरात स्वागत केले आणि याच फकिराला साईबाबा हे नाव पडले. आजही शिर्डीत येणारा प्रत्येक भाविक सर्वप्रथम श्री खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतात ही परंपरा मोठ्या श्रद्धेने सुरू आहे. ट्रस्टतर्फे वर्षभर चंपाषष्ठी उत्सव, रामनवमी उत्सव, गुरुपौर्णिमा, विजयादशमी आदी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
ढोल-ताशा, साईबाबांच्या नावाचा गजर करत हे सर्व यात्रेकरू श्री खंडोबा मंदिरात येतात. त्याठिकाणी श्री म्हाळसापती ट्रस्टतर्फे प्रत्येक भाविकाचे स्वागत करण्यात येते. शेजारीच भव्य मंडप उभारून दिवसभर प्रसादरूपी अन्नदानाची व्यवस्था हेच या ट्रस्टचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा या साईबाबांच्या शिकवणीची प्रेरणा घेऊन आम्ही सर्व ट्रस्टमधील सदस्य पालखीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेचे भाग्य आम्हाला लाभले. ही श्री साईबाबांची व म्हाळसापती महाराजांची कृपा आहे.
संदीप नागरे, विश्वस्त, श्री म्हाळसापती महाराज ट्रस्ट, शिर्डी.