इम्रान जमादार
चितळी – दुष्काळी पट्ट्यामध्ये यावेळी ज्वारीचे उत्पादन घटल्यामुळे ज्वारीचे भाव पाच हजाराच्या वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गव्हाणे 3500 ची पातळी ओलांडली असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खटाव तालुक्याच्या पूर्व, दक्षिण भागामध्ये गेल्या दोन वर्षापासून टेंभू, तारळी, उरमोडी यासारख्या उपसा सिंचन योजनेचे पाणी येऊ लागल्याने या भागातील शेतकरी पारंपारिक ज्वारी, बाजरी, तुर,मटकी,उडीद, चवळी या पिकांना बाजूला सारून गहू, ऊस, मका, फळबागा या पिकांकडे वळला आहे. त्यामुळे बाजरी, ज्वारीचे आगार समजल्या जाणाऱ्या या दुष्काळी पट्ट्यात यावर्षी बाजरी व ज्वारीचे प्रमाण कमी झाले आहे.
ज्वारी, बाजरीचे प्रमाण कमी झाल्याने सध्या बाजारामध्ये साडेचार हजार ते पाच हजार रुपयांनी ज्वारी प्रतिक्विंटल विकली जात आहे. हीच ज्वारी पुढील महिन्यांमध्ये पाच हजारांच्या वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच थंडीचे प्रमाण व पावसाचे प्रमाण कमी असल्याने गव्हाच्या उत्पन्नातही घट झाली आहे. सध्या ग्राहक तीन हजार ते साडेतीन हजारापर्यंत गहू खरेदी करत असल्याने गव्हालाही चांगले दिवस आले आहेत.
व्यापाऱ्याकडून चुकीची दिशाभूल करण्यात येऊ लागली असल्याने सध्या बाजारामध्ये गव्हाची आवक वाढली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकरी वर्गाचा गहू बावीसशे रुपये ते अठ्ठावीशे रुपयाच्या दरम्यान खरेदी केला जात आहे. मात्र हाच गहू ग्राहक शेतकऱ्यांकडून तीन ते साडेतीन हजार रुपयांनी घेत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची चाललेली फसवणूक थांबणे गरजेचे आहे किंवा शेतकऱ्यांनीही व्यापाऱ्यांना माल न घालता जास्तीत जास्त थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. ज्वारीचा दर पाच हजाराच्या वर जाण्याची शक्यता असल्याने यावर्षी दुष्काळी पट्ट्यामध्ये ज्वारीचे उत्पादन कमी झाले आहे .सध्या बाजारात 4 हजार ते 5 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने गुणवत्तेवर ज्वारी विकली जात आहे. मात्र ही ज्वारी पुढील महिन्यात पाच हजाराच्या वर जाऊ शकते.