सोनम वांगचुक, मॅगसेसे पुरस्कार विजेते
सद्यपरिस्थितीत हिमालयातील हिमनद्या प्रतिवर्ष काही मीटरपासून अनेक मीटरपर्यंत घातक वेगाने मागे सरकल्या आहेत. पाऊसमान कमी होणे, सरासरी तापमानवाढ आणि हिमनद्यांचे पाणी आटणे या सर्वांमुळे या नद्यांकाठी वसलेली काही हिमालयीन गावे हळूहळू उजाड होत चालली आहेत. त्यामुळे शेतजमीनही बरबाद होते आहे.
लडाख हा हिमालयाच्या पाणलोट क्षेत्राच्या उत्तर टोकाला असणारा प्रदेश. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक आणि पर्यावरणामुळे लडाखला एक वेगळी ओळख मिळाली आहे. बर्फाळ वाळवंट म्हणून ओळख असलेला लडाख समुद्रसपाटीपासून सुमारे 3 हजार मीटर उंचीवर असून 96 हजार 701 वर्ग किलोमीटर क्षेत्रात तो पसरलेला आहे.
लडाखमध्ये वर्षाकाठी 100 मिलीमीटर इतके पर्जन्यमान असते; तर तापमानही उणे तीस अंश सेल्सिअसपासून तीस अंश सेल्सिअस दरम्यान असते. ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत लडाखमध्ये थंडीचा मोसम असतो. इथे वर्षातील केवळ एक तृतियांश काळ शेतीसाठी अनुकूल वातावरण असते. या संपूर्ण प्रदेशातील गावे ही पाण्याच्या एखाद्या झऱ्याच्या काठी किंवा जलस्रोतांजवळ वसलेली आहेत.
परिणामी, उन्हाळ्यात हिमनद्या वितळून येणाऱ्या पाण्याचा वापर इथे केला जातो. या क्षेत्राचे परिस्थितीकी किंवा पर्यावरणीय योगदान आणि ऐतिहासिक संदर्भ अत्यंत महत्त्वाचे असूनही येथे मानवी हस्तक्षेप अत्यंत निष्काळजीपणे झालेला दिसतो. जागतिक हवामान बदलांचाही या क्षेत्रावर मोठा परिणाम झालेला आहे. विशेषतः उंचीवर असलेल्या क्षेत्रामध्ये वेगाने वाढत असलेल्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो.
या सर्व परिस्थितीत तीन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होताहेत. पाण्याची टंचाई, इमारतींच्या अंतर्गत तापमानात घट आणि कृषीआधारित मूळ अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलामुळे लडाखमधील तरुणांचे गावापासून होणारे स्थलांतर. एक आव्हान म्हणूनच पुढे येणाऱ्या या मुद्द्यांना सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाने लडाखमधील हिमालयीन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज संघटनेच्या सहकार्याने नोव्हेंबर 2019 पासून तेथील आदिवासी समुदायाची नोंदणी आणि विकास यासाठी एक प्रकल्प सुरू केला.
अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे बर्फाच्या स्तूपांच्या मदतीने विस्थापित झालेल्या गावांचे पुनर्वसन करणे. हा प्रकल्प स्थानिक नागरिक, या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी संघटना, बिगर सरकारी संघटना आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांचा एक उत्तम नमुना आहे.
सात वर्षांपूर्वी म्हणजे 2013 च्या हिवाळ्यात या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी सेकमोल शाळेत नमुन्यादाखल एक बर्फाचा स्तूप निर्माण केला गेला.
पारंपरिक प्रथा आणि च्युयांग नॉरफेल यांच्या कृत्रिम हिमनद्यांच्या कामातून प्रेरणा घेत लडाखच्या विविध भागात अशा बर्फस्तूपांची निर्मिती केली गेली. आदिवासी कल्याण मंत्रालय आणि सेकमोल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आकाराला येणाऱ्या या प्रकल्पाने आता मोठा पल्ला गाठला आहे. सामायिक विचारधारेच्या व्यक्ती आणि संघटनांच्या विचाराने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत आणि परदेशातही बर्फाच्या स्तूपांच्या निर्मिती प्रक्रियेत खूप सुधारणा झाली आहे. 2019-20 च्या हिवाळ्यात लडाखमध्ये विविध कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि वृक्षारोपण अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण पातळीवरील 250 लाभार्थींना या प्रक्रियेत प्रशिक्षण देण्यात आले आणि या मुद्द्याविषयी जागरूकता निर्माण केली.
त्यामुळेच या प्रकल्पात सहभागी झालेले गावकरी सुमारे 75 अब्ज लीटर पाण्याची बचत करण्यास सक्षम ठरले. याच प्रयत्नांमुळे लडाख आइस क्लायबिंग फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांनी स्थानिक युवकांना इको आंत्रप्रयुनियरशिपमध्ये सामील होण्याची संधी मिळाली आहे.
या योजनेची सुरुवात यंदाच्या वर्षी कुलम गावापासून झाली. हे गाव लेहपासून पन्नास किलोमीटर लांब आहे. सात आणि चार कुटुंबांच्या दोन वस्त्या, अपर आणि लोअर कुलममध्ये विभागलेले आहे. वरील भागातील ग्लेशिअर्स आटल्याने अपर कुलम भागातील सर्व कुटुंबे 2012 मध्ये गाव सोडून जवळच्या उप्शी येथे स्थलांतरित झाले होते. या लोकांनी शेतीवाडीची आपली परंपरागत कामे सोडून दिली आणि मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली.
काहींनी रोजच्या गरजा भागवणाऱ्या वस्तूंची दुकाने सुरू करून गुजराण करायला सुरुवात केली. ही योजना नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या चार महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली होती. ती सुरू होण्यापूर्वी या परिसराचे सर्वेक्षण केले गेले, मोजणी केली गेली. लोकांच्या गरजा ओळखण्यासाठी आणि प्रकल्पात त्यांचे विचार, मते सामावून घेण्यासाठी गावाची आणि सार्वजनिक पातळीवर एक बैठक घेण्यात आली. त्यातून ही योजना स्वतः स्थानिक ग्रामस्थांकडून अमलात आणली गेली.
ही योजना कार्यान्वित करण्याच्या पहिल्या टप्प्यात कुलम निवासी ज्यांना स्थानिक भागात कुलुम्पा म्हटले जाते, त्यांच्याच मदतीने बर्फाच्या स्तूपांसाठी आवश्यक ती उपकरणे लावली गेली. मुख्य कामाचा ढाचा आणि आराखडा तयार करण्यात आला. पाइपलाइन टाकण्यात आल्या. घुमटाची संरचना करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनाही या कामाच्या प्रक्रियेचा अनुभव मिळाला. त्यातूून सर्व पातळ्यांवर लाभार्थींना सक्रिय सहभाग घेण्यास प्रेरित करण्यात आले. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत वरच्या कुलम गावाने 45 फूट उंचीचा आइसस्तूप निर्माण केला.
लडाखच्या कडाक्याच्या थंडीमध्ये उच्च तापमानामुळे पाण्याच्या नळ्यांमध्ये बर्फ होणे, उपकरणे फुटणे तसेच मुख्य कामात पाण्याचा प्रवाह कमी होणे अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तरीही प्रत्येक वेळी प्रत्येक अडचणीवर स्वदेशी उपाय शोधण्यात आला. आता यावर्षीचे धडे पुढच्या वर्षाची संपत्ती ठरतील.
मोसम संपेपर्यंत बर्फाच्या स्तूपाच्या संरचनेमध्ये 3 लाख लीटर पाणीसाठा झाला. बर्फाच्या स्तूपाची ही संरचना एप्रिलच्या शेवटी वितळली, परंतु तोपर्यंत कुलमच्या शेतांसाठी आवश्यक ते पाणी या स्तूपांनी उपलब्ध करून दिले होते. पाण्याच्या टंचाईचा सामना करून त्यावरील उपाय शोधल्याने या प्रकल्पातील कुलम्पाच्या गुंतवणुकीवर मोठा प्रभाव पडला आहे.
येत्या काही वर्षांमध्ये हा प्रकल्प पाणी व्यवस्थापनातील एक तंत्र किंवा धोरण न राहता भविष्यात संपूर्ण ग्राम पुनर्विकास मॉडेल बनेल आणि आपली नवी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेल. या बर्फाच्या स्तूपांनी लडाखच्या आदिवासीबहुल गावांची केवळ तहानच भागवलेली नाही; तर या ग्रामस्थांसाठी आत्मनिर्भर होण्याचा मार्गही प्रशस्त केला आहे. आज हे स्तूप पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरताहेत. पर्यावरण संरक्षणाचा एक दीर्घ मार्ग म्हणून या बर्फाच्या स्तूपांकडे पाहता येईल.