काकीनाडा (आंध्र प्रदेश) – आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील एका कारखान्यात तेलाची टॅंकरची टाकी साफ करताना गुदमरल्याने तब्बल सात महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. रागमपेटा गावात खाद्यतेल उत्पादक कंपनीचे टॅंकर साफ करताना गॅसचा श्वास घेतल्यानंतर सातही कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
ही घटना काकीनाडा जिल्ह्यातील पेद्दापुरम मंडलातील जी. रागामपेटा येथील अंबाती सुबन्ना तेल कारखान्याच्या आवारात घडली.
टॅंकरची टाकी साफ करण्यासाठी या सर्व महिला एकामागून एक 24 फूट खोल तेलाच्या टॅंकरमध्ये शिरल्या होत्या. मृतांपैकी पाच जणी अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील पडेरू येथील असून अन्य दोघी पुलिमेरू गावातील आहेत.
वेचंगी कृष्णा, वेचंगी नरसिंहम, वेचंगी सागर, कोरथाडू बनजी बाबू, करी रामाराव, व्ही. प्रसाद आणि कट्टामुरी जगदीश अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला असून नक्की कोणत्या विषारी वायूमुळे या महिला मृत्युमुखी पडल्या, त्याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रवींद्रनाथ बाबू, जिल्हाधिकारी कृतिका शुक्ला यांनीही घटनास्थळी धाव घेतली. कृतिका शुक्ला यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसाठी सरकारकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले. तसेच तेल कारखान्याच्या व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई केली जाईल.