- शेकडो पेंडिंग ऑफर लेटर झाले रद्द : कॉल सेंटरमध्ये काम करणारे हजारो बेरोजगार
पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा आटोक्यात येत आहे. सर्व उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरळीत होत आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या. त्यापैकी अनेकजण आता पुन्हा शहरात परतले असून अद्यापही नोकरीच्या शोधात आहेत. विशेषत: केपीओ, बीपीओ क्षेत्रात कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्यांची अवस्था बिकट आहे.
मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाले. सुरुवातीच्या काळात अफवा आणि करोनाबाबत पूर्ण माहिती नसल्याने करोनाचे भय इतके भयंकर होते की अनेकांनी नोकऱ्यांचा विचार न करता थेट गावाकडचा रस्ता धरला. मार्च महिन्यापूर्वी अनेकांनी आपल्या जुन्या नोकरीचा नोटीस पिरीयडवर राजीनामा देऊन नवीन नोकरी शोधली होती. बहुतेक आयटीयन्सकडे नवीन जॉबचे ऑफर लेटरही होते. परंतु नोटीस पिरीयड संपण्याआधीच लॉकडाऊन सुरु झाले आणि अनेकांना आपल्या नव्या नोकरीच्या ठिकाणी रुजूच होता आले नाही. असे अनेक ऑफर लेटर रद्द झाले आणि त्यांना मिळेल त्या पगारावर दुसरीकडे नोकरी शोधावी लागली.
कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना लॅपटॉप आणि इंटरनेटच्या अभावी वर्क फ्रॉम होम चा पर्याय निवडता आला नाही. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, संगणक, इंटरनेट व इतर उपकरणे उपलब्ध करुन दिली. परंतु काही कंपन्यांनी मात्र ही व्यवस्था कर्मचाऱ्यांना स्वत:च करावयास सांगितली. ही व्यवस्था करणे ज्यांना शक्य नव्हते अशा हजारो तरुणांना नोकरी सोडून गावी जावे लागले. आता हे तरुण परत आले असून नोकरीच्या शोधात आहेत.
एनआयटीईएस (नॅसेंट इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉइज सिनेट) या आयटीयन्सच्या संघटनेचे अध्यक्ष हरप्रीत सलूजा यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले की, करोनाच्या काळात अनेकांना मिळालेले ऑफर लेटर व्यर्थ ठरले. अशा आयटीयन्सला संघटनेकडून काम मिळवून देण्यात मदत करण्यात आली होती. परंतु अशा आयटीयन्सची संख्या खूप अधिक आहे. दुसरीकडे बहुतेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देत होत्या त्या काळात काही बड्या कंपन्यांनी हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले.
एका मल्टीनॅशनल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तुमच्याकडे लॅपटॉप आणि इंटरनेट आहे का ? अशी विचारणा केली आणि ज्यांच्याकडे ही सुविधा नव्हती त्यांना नोकरी सोडावी लागली. आता हे कर्मचारी परतत असून त्यांच्यासाठी नोकरी शोधणे मोठे आव्हानात्मक काम ठरते.
कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणांना इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांच्या तुलनेत खूपच अत्यल्प वेतन असते. अनेकजण पेईंग गेस्ट किंवा एका रुममध्ये चार-पाच जण मिळून राहतात. त्यांना वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप मिळविणे आणि आहे त्या स्थितीत काम करणे शक्य नव्हते. अशा कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी बाहेरचा रस्ता दाखविला. येथे खाण्या-पिण्याची सोय होणार नसल्याने लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपले गाव गाठले. गावांमध्ये कंपनीला आवश्यक असणारा इंटरनेटचा स्पीड न मिळाल्यामुळेही काही जणांच्या नोकऱ्या गेल्या.
तशी तरतूदच नाही
जुना जॉब सोडत असताना हातात नव्या जॉबचे ऑफर लेटर असूनही शेकडो आयटीयन्सना बेरोजगार व्हावे लागले. देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या लॉकडाऊनची परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली असल्याने अशी समस्या ही पहिल्यांदाच आली आहे. यामुळे ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या कालावधीत कर्मचारी रुजू न झाल्यास कर्मचाऱ्याच्या बाजूने निर्णय घेण्याबाबतची तरतूद कायद्यात नाही. अनेक कंपन्यांमध्ये यामुळे मनुष्यबळ कमी झाले. जे मनुष्यबळ उपलब्ध होते ते वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांच्याकडून कंपन्यांनी अतिरिक्त काम करवून घेतले. यामुळे कंपन्याना एकप्रकारे फायदाच झाला. केवळ आयटीयन्सच नव्हे तर इतर क्षेत्रातील कर्मचारी आजही 12 ते 14 तास काम करत आहेत.
राज्य सरकार आणि नियोक्ते यांच्यासाठी ही जबाबदारीची वेळ आहे. कॉर्पोरेट्स कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांबद्दल अधिक सहानुभूती दर्शविली पाहिजे. आयटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांविषयी एनआयटीईएसने कामगार मंत्रालयाला यापूर्वी सांगितले आहे. राज्य शासनाने आयटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत.
– हरप्रीत सलूजा, अध्यक्ष एनआयटीईएस