पिंपरी -युक्रेनच्या खारकिओ भागात एकवटलेल्या वैद्यकीय संस्था व विद्यापीठांपासून पुर्वेला 550 किलोमीटरवर रशियाने बॉम्बहल्ला केला आहे. त्यामुळे सर्वाधिक भारतीय विद्यार्थी अडकलेला हा भाग सध्या संवेदनशील आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे बसमधून हंगेरी-पोलंडमध्ये सुखरुपपणे स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खारकिओतील एमबीबीएसची विद्यार्थिनी गायत्री हिचे वडील विजयकुमार पोरे यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली.
रशिया व युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर पोरे यांनी गायत्रीला मायदेशी आणण्यासाठी विमान तिकीटे बुक केली होती. मात्र बॉम्बहल्ल्यामुळे विमान उड्डाणे रद्द झाल्याने परतीचे मार्ग बंद झाले आहेत. बॉम्ब हल्ल्यामुळे हे विद्यार्थी घाबरले आहेत. काल दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या मेसमधून जेवण पुरविण्यात आले होते. मात्र, आता महाविद्यालये बंद असल्याने हे सर्व विद्यार्थी वसतीगृहात परतले आहेत. तर उपासमार होऊ नये, याकरिता काही दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तुंचा साठा त्यांनी केला आहे. मात्र, सध्या हे सर्व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन दिवस काढत असल्याची खंत पोरे यांनी व्यक्त केली.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर केंद्र सरकारने उशिराने निर्णय घेतल्याने हे विद्यार्थी अडकले असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पोरे म्हणाले की, कपुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हेल्पलाइनवर आम्ही सर्व माहिती भरुन दिली असून, ती केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाकडून भारतीय दुतावासाकडे ही माहिती सुपूर्त करण्याची प्रक्रिया पार पडली आहे. याशिवाय युक्रेनमधूनही भारतीय नागरिकांची माहिती भारतीय दुतावासाला कळविण्यात आली आहे. आता आमच्या नजरा केंद्र सरकारच्या हालचालींकडे लागल्या आहेत. आज रात्री दोन वाजता बसमधून भारतीय नागरिकांचे पोलंड-हंगेरीकडे सुखरुपपणे स्थलांतर होणार असल्याचची माहिती समजते, असे पोरे म्हणाले.