मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाजानदेश यात्रेच्या समारोप सभेत उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टीका केली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्यावेळी युतीचा निर्णय झाला असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मोदींना उद्देदेशून देखील भाष्य केले. “में बयानबाजी नहीं कर रहा हूं, में तो तमाम हिन्दुओं की भावना बोल रहा हूं। कोर्टावरती आमचा विश्वास आहेच, न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहेच. पण हा खटला खूप वर्षे चालला आहे आणि त्याकरता गेल्या वेळी मी स्वतः अयोध्येला गेलो होतो आणि आज देखील माझी इच्छा आहे की विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी कदाचित जर मला शक्य झालं तर मी अयोध्येला जरूर जाईन.”
तसेच आरे वर देखील उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. विकासकामाला आम्ही कधीच विरोध केलेला नाही, मेट्रो कारशेडला पण विरोध केलेला नाही, फक्त तो जो आरे मध्ये करण्याचा अट्टाहास आहे त्या अट्टाहासाला आम्ही अकारण नाही तर सकारण विरोध केलेला असल्याचे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे समोर म्हणाले, नाणारच्या बाबतीत सुद्धा हा जो काही आमचा विरोध आहे तो विरोध तिथल्या स्थानिक जनतेसाठी म्हणूनच केलेला आहे आणि आज देखील मला नाही वाटत तिथल्या स्थानिक जनतेच्या मानसिकतेत कोणताही बदल झालेला आहे.