Chandrasekhar Bawankule – इंडिया आघाडी जर सत्तेत आली तर सनातन हिंदू धर्म संपवू, अशी घोषणा उदयनिधी यांनी केली आहे आणि त्यांच्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आघाडी आहे.
ठाकरे यांनीच हिंदुत्त्वाची वाट लावली आहे आणि आता लोकांनाही ते कळले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे.
बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत असताना केंद्र सरकारने निधी दिला नाही. मात्र महायुती सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यात निधी येत असल्याचा आरोप केला जात आहे.
मात्र अडीच वर्षात केवळ दोनदाच मंत्रालयात गेलेले फेसबुक लाइव्ह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या योजनांसाठी किती प्रस्ताव पाठवले? त्याचा कितीवेळा पाठपुरावा केला, असा प्रश्न बावनकुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी विविध कार्यक्रमांच्यानिमित्ताने पंतप्रधानांना तीन-चारवेळा महाराष्ट्रात आणले. त्यामुळे महाराष्ट्राला निधी मिळत आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे झोपून राहीले. महाराष्ट्राला अडीच वर्षे मागे टाकण्याचे काम त्यांनी केले.
ते जर प्रस्ताव घेऊन गेलेच नाहीत, तर निधी कसा मिळणार, असा प्रश्न बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांना मोदी चालत नव्हते. ते शरद पवार यांच्या घरी जाऊन बसले. त्यामुळे ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
शरद पवारांवरही निशाणा !
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर थेट टीका करताना, शरद पवार यांच्याकडून दहशतवाद्यांचे समर्थन करण्यात येत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. इस्रायल-हमास-पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धावर भाष्य करताना,
मतांच्या राजकारणासाठी शरद पवार दहशतवाद्यांचे समर्थन करतात, असेही ते म्हणाले. मतांसाठी दहशतवाद्यांना किती मदत आणि समर्थन करायचे हे शरद पवारांच्या वक्तव्यावरुन कळते. मी त्यांचा निषेध करतो असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.