Uddhav Thackeray । शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता या सुनावणीची नवीन तारीख लवकरच सांगण्यात येईल, असे आज सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या निर्णयात सभापतींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. यासोबतच शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचाही निकाल दिला होता. विधानसभेतील बहुमताच्या जोरावर शिंदे गटालाच खरी शिवसेना मानण्याचा सभापतींचा निर्णय चुकीचा असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून येत्या नोव्हेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी यावर वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर हे प्रकरण आहे. ते नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होणार आहेत. निवृत्तीआधी त्यांना त्यांच्यासमोरील प्रकरणे संपवायची असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह आणि पक्षनाव पुन्हा मिळण्याची संधी असणार आहेत.
वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ शिंदे याना प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण आणि नाव मिळू शकतं का यावर ते म्हणाले,’आमदार आणि खासदार संख्येच्या बळावर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मागच्या वर्षी फेब्रुवारीत दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले.सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिली नाही. परंतु, पुढील आदेश येईपर्यंत उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव आणि मशाल पक्षचिन्ह वापरण्याचे निर्देश दिले. परंतु, आता त्याला एक वर्ष झाले आहे.’ त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकारण तापले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेमके काय होणार असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
हेही वाचा
Eknath shinde । ‘कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल
Rituraj Singh Died । ‘अनुपमा’ अभिनेता ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन