नाशिक – “शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने काढून घेतले, मात्र शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच जनतेच्या मनात आहेत’, असं परखड मत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. नाशिकमध्ये नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले.
तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय धक्कादायक आहे. स्थापनेपासून शिवसेना म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. मात्र, यापुढे शिवसेना हा शिंदेंचा पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे. आणि याच मुद्द्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरही जनता शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मानते, असं ते म्हणाले. भाजपविरुद्ध हळूहळू सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपला लोकशाहीवर प्रेम करणे पटत नाही. नोटाबंदी, बेरोजगारी, महागाई याविरुद्ध बोलले की तुरुंगात टाकले जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.