मुंबई – एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यातच काल शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगलाही काल सोडला.
त्यांच्या या कृतीबद्दल त्यांची सगळीकडे प्रशंसा होत आहे. त्यात आता चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे. उध्दव यांना सत्तेचा लोभ नसल्याचे दिसून आले असे सिमी यांनी म्हटले आहे.
उध्दव यांना हव्यास नाही व ते राजकीय खेळ खेळत नाही. त्यांच्यासारखे राजकीय नेते हल्ली कमीच पाहायला मिळतात असे ग्रेवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, ग्रेवाल यांची ही टिप्पणी मात्र काही जणांना रूचलेली नाही. उध्दव यांना सत्तेची लालच नव्हती, तर त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात का केला, त्यांच्या स्वत:च्या पक्षाचेच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. आपल्या लोकांना सोबत घेउन जो चालतो तो नेता असतो. मात्र उध्दव ठाकरे तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेतच रममाण झाले अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे.
तर उध्दव ठाकरे सोनिया गांधी यांना भेटायला गेले तेव्हाच त्यांनी पक्षाची प्रतिष्ठा घालवली होती अशी प्रतिक्रिंया अन्य एका व्यक्तीने दिली आहे.