मुंबई – एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. शिंदे गट आणि ठाकरे गट उदयाला आहे. शिवसैनिकही शिंदे गट आणि ठाकरे गटात विभागले गेले. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या अनेक शाखांवर दावा केला. अनेक ठिकाणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मात्र आता शिवसेनेच्या चेंबूरमधील शाखेबाबत तोडगा काढण्यात आला आहे. दोन्ही गटाने सामंजस्याची भूमिका घेऊन अर्धी अर्धी शाखा वापरण्याचे ठरवले असल्याची माहिती समोर आली आहे. आज या वादावर पडदा पडला आहे.
मुंबईतील चेंबूरमध्ये पांजरपोळ येथे शिवसेनेची 146 क्रमांकाची शाखा आहे. ही शाखा माजी आमदार तुकाराम काते यांच्या ताब्यात होती. मात्र ते शिंदे गटात गेल्यावर या शाखेला त्यांनी टाळे मारले. त्यावर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि शिवसैनिकांनी टाळे मारले होते. यामुळे अनेक दिवस ही शाखा बंद होती. मात्र शिंदे गटाच्या वतीने ही शाखा दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर प्रमोद शिंदे आणि शिवसैनिक तिथे पोहचले. यामुळे वाद निर्माण झाला होता. या वाद मिटवण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा इथे आला. दोन्ही गटाने सामंजस्याची भूमिका घेत तोडगा काढला आहे. या शाखेचे आता दोन भाग केले जाणार आहेत. अर्धी शाखा शिंदे तर आर्धी शाखा ठाकरे गट वापरणार आहेत.