मुंबई – एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. त्यानंतर आमच्याकडे जास्त आमदार, खासदार असल्याचे सांगत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावे असा दावा, शिंदे यांनी केला. न्यायालयानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहोचले. निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेना नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्हा दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचे सांगत चिन्ह गोठवले आहे. त्यानंतर नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निवडणूक आयोगाकडून दोन्हा गटाला सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हे सूचवली असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना निवडणूक चिन्हांचे पर्याय द्यायला सांगितले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने उगवता सूर्य, त्रिशूल आणि मशाल हे पर्याय दिलेले होते. मात्र आता या पर्यायांपैकी एकही चिन्ह निवडणूक यादीत नसल्याचे समोर आले आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून तीन पर्याय –
शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय दिले आहेत. यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह पोहचवण्याचे आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेले शिवसेना नाव संपूष्टात आणले अशी भावना शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत आघाडी केल्यामुळे आज हे दिवस आले असल्याची टीका शिंदे गट आणि भाजपकडून व्यक्त केली जात आहे.