मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आज दुपारपासूनच शिवाजी पार्क मैदानावर मनसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या या सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागले होते. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी कायमच राज ठाकरेंच्या विरोधात षडयंत्र केलं असा घणाघात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.
शिवाजी पार्कवर आयोजित या गुढी पाडव्यानिमित्तच्या सभेदरम्यान बोलताना संदीप देशपांडे यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. उद्धव ठाकरेंनी कायमच म्हणजेच बाळासाहेब ठाकरे असतानाही राज ठाकरेंच्या विरोधात षडयंत्र केलं असं देशपांडे यावेळी म्हणाले. तसेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे राज ठाकरे कधीही म्हणाले नाहीत कारण त्यांच्याकडे कर्तृत्व आहे. उद्धव ठाकरेंनी अशी परिस्थिती निर्माण केली की राज ठाकरे पक्षाबाहेर पडले पाहिजेत अशी टीका देखील यावेळी देशपांडे यांनी केली.
आदित्य ठाकरे काय बोलले? मनसे संपलेला पक्ष आहे त्याबद्दल बोलणार नाही. आज त्या आदित्य ठाकरेंना सांगतो महाराष्ट्र सैनिक तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील देशपांडे यांनी यावेळी दिला.
सध्याचे राज्यातील वातावरण पाहता राज ठाकरे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंनी आपण पाडवा मेळाव्यात सविस्तर बोलणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर सर्वांनाच राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. सभेपूर्वी शिवाजी पार्कवरील संपूर्ण वातावरण भगवेमय झाल्याचे दिसून आले.