रायपूर : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. डीआरजीचे (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) पथक आणि नक्षलवाद्यामंध्ये सकाळी चकमक झाली होती.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. 15 सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते.
तर दंतेवाडा जिल्ह्यात दोन आणि बीजापुरमध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. जवानांकडून होत असलेल्या या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले असून काहीजण आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत आहेत, तर काहीजण आपला रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांवर हल्ले करत असल्याचे सांगण्यात आले आहे.