रिझर्व्ह बॅंकेने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (पीएमसी) ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेकडून पुन्हा एकदा दिलासा देण्यात आला आहे. खातेधारकांना पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपयांपर्यत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 40,000 रुपये इतकी होती.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बॅंकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच बॅंकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याची क्षमता तपासून पैसे काढण्याची मर्यादा 40,000 रुपयांवरुन 50,000 रुपये करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या नव्या आदेशानंतर आता बॅंकेच्या सुमारे 78 टक्के खातेधारकांना आपल्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढून घेता येणे शक्य होणार आहे.
त्याचबरोबर खातेधारकांना पीएमसी बॅंकेच्याच एटीएममधून ही 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासही परवानगी देण्यात आली आहे. पैसे काढण्यात खातेधारकांना अडचणी येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पीएमसी बॅंकेवर निर्बध लादण्यात आल्यानंतर आतापर्यत नऊ खातेदारांचा मृत्यू झाला आहे.
तसेच पीएमसी बॅंकेचे ग्राहक बॅंकेत जमा केलेले त्यांचे पैसे सुरक्षित असल्याची हमी देण्याची मागणी आरबीआयकडे करीत आहेत. पीएमसी बॅंकेचे पुनरुज्जीवन करावे जेणेकरुन त्यांचे पैसे काढता येतील अशीही मागणी त्यांनी केली आहे.