महाबळेश्वर -पाचगणीतील एका महिलेपाठोपाठ कासरूड येथील दोन महिलांना करोनाची लागण झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील बाधितांची संख्या तीन झाली आहे. तालुका प्रशासनाने मेहनतीने गेले दोन महिने रोखून धरलेल्या करोनाचा मुंबईकरांमुळे तालुक्यात प्रवेश झाला आहे. ही संख्या झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त होत असून तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.
महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांबरोबर तालुक्यात करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून महसूल, आरोग्य विभाग, पालिका व पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली होती. त्यामुळेच जिल्ह्यात इतरत्र करोनाचा रुग्ण आढळत असताना महाबळेश्वर तालुका करोनामुक्त राहिला होता; परंतु जिल्ह्याबाहेरून आलेल्या तीन महिला करोना पॉझिटिव्ह झाल्याने आता महाबळेश्वर तालुकाही अपवाद राहिलेला नाही. जिल्ह्याबाहेर असलेले तीन हजार 600 चाकरमानी आजअखेर तालुक्यात आले आहेत. त्यात मुंबईकरांचा भरणा अधिक आहे. जे तीन रुग्ण आढळले, ते मुंबईतून आले आहेत.
मुंबईच्या गोरेगाव येथील 22 जण विनापरवाना दि. 19 रोजी महाबळेश्वरला ट्रकमधून आले. हा ट्रक कुंभरोशी नाक्यावर अडविण्यात आला. त्यांच्याकडे परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना पोलादपूरला पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ट्रक पुन्हा मुंबईला पाठविला व ते सर्व जण पुन्हा चालत कुंभरोशीला आले. त्यांना पुन्हा तालुक्यात प्रवेश नाकारल्याने ते दोन दिवस तेथेच राहिले.
नातेवाइकांनी त्यांच्या जेवणाची सोय केली होती.
दोन दिवसांनतर ते प्रशासनाची नजर चुकवून कासरूडला पोहोचले. याची माहिती मिळताच त्यांना दि. 21 रोजी तळदेव येथे इन्स्टिटयुशनल क्वारंटाइन करण्यात आले. त्यातील चार जणांना करोना चाचण्यांसाठी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यातील दोन महिलांचे अहवाल काल (दि. 24) पॉझिटिव्ह आले. या महिलांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सातारा येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, ग्राम समित्या मुंबईकराची काळजी घेत असल्याने करोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येईल; परंतु स्थानिकांनी घाबरून न जाता घरातच रहावे सुरक्षित रहावे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी केले आहे.