काऱ्हाटी (वार्ताहर) – संपूर्ण जगभरात कोरोना ने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या मालाला ग्राहक नसल्याने कवडीमोल भाव मिळत आहे. अशीच अवस्था सध्या सुपे (ता. बारामती) परिसरातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.
उन्हाळ्यात कलिंगड व खरबूजची मागणी वाढते. या आशेने सुपे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडची लागवड केली. पण लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून कलिंगड घेतले नाहीत. तर उत्पादन खर्च निघावा म्हणून शेतकरी रस्त्याच्याकडेला बसून विक्री करीत आहे. मात्र, ग्राहक नसल्याने 10 ते 12 रुपये किलोवर उत्पादकांनी दर आणले असूनही ग्राहक येत नसल्याचे उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.