नाशिक – दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ अपघातात ठार झाल्याची घटना घडली आहे. गोरख लक्ष्मण जाधव (वय 35), सोमनाथ लक्ष्मण जाधव (वय 25, दोघेही रा. मुरंबी, इगतपुरी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. ही घटना नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळ घडली आहे.
गोरख यांचा लहान भाऊ सोमनाथला दारूचे व्यसन होते. त्याचे व्यसन सोडविण्यासाठी दोघे वणी येथे दुचाकीवरून गेले होते. तेथे औषधोपचार करून परत गावाकडे निघाले असता मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळील उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नीसह दोघांनाही दोन मुली, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी अबंड पोलिस ठाण्यात गुन्हा वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.