सातारा – जिल्हा रुग्णालयाच्या आरटीपीसीआर लॅबसमोरच सांडपाणी वाहून नेणारे गटारच तुंबल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. लॅबमध्ये स्वॅब तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत असून साथरोगांच्या आजाराचीही शक्यता बळावली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय मुख्य इमारतीच्या पूर्वेला साधारण दीडशे मीटर अंतरावरील धर्मशाळा इमारतीलगत स्वतंत्र कक्षामध्ये आरटीपीसी आर लॅबचे काम चालते. येथे दोन डॉक्टर, सहा परिचारिका व तीन तंत्रज्ञ असे अकरा कर्मचारी दिवसभर सेवा बजावतात. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून स्वॅब तपासणीसाठी येथे नागरिक येत असतात. मात्र, सध्या या इमारतीचा परिसर दुर्गंधीचा आगार बनला आहे.
या लॅबच्या प्रवेशद्वारावरच रस्त्यालगतचे मुख्य गटार व त्याचे तीन चेंबर सांडपाण्याने तुंबले आहे. हे पाणी उताराने जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर थेट रस्त्यावर पोहचत आहे. गटाराच्या मॅनहोल जाळीमध्ये कचरा साठल्याने पाण्याचा निचरा थांबून तुंबण्याच्या प्रक्रियेमुळे डासांची उत्पत्ती होत आहे. प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे. लॅबमध्ये टेस्टिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच आत यावे लागत आहे.
महिला रुग्णालय, आरटीपीसीआर लॅब व धर्मशाला कक्षासह जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निवासस्थान स्वच्छतेची जवाबदारी सात सफाई कामगार व एक मुकादम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. येथील गटारे बरेच दिवस तुंबल्याने ही स्वच्छता यंत्रणा काय काम करते हा प्रश्न निर्माण झाला आहे.
भुयारी गटार योजना कागदावरच
जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन कारभारी डॉ. आमोद गडीकर यांच्या काळात तब्बल तीन कोटीचा बंदिस्त गटार योजनेचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला होता. मात्र, दुर्लक्षामुळे ही योजना रखडली. कोविडच्या लाटेत सिव्हिलच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे.
सिव्हिलमधीलच गटारे तुंबल्याने येथेच मलेरिया, डेंग्यू सारख्या साथरोग आजारांचा धोका उत्पन्न झाला आहे. सातारा शहरात ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. या सांडपाणी प्रश्नाकडे भाजपचे पदाधिकारी निलेश शहा यांनी रूग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. याप्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.