छत्रपती संभाजीनगर – माझ्याविरोधात एसआयटीची चौकशी लावण्यात आली. मी गरीब मराठ्यांचे काम करत आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. कारण माझा कोठेही दोष नाही.
मी मागेच मराठा समाजाला सांगितले की त्यांच्यासाठी मी एक काटा आहे. सरकार आणण्यासाठी मला त्यांना गुंतवायचे आहे, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी मांडली.
मनोज जरांगे म्हणाले, मी कोठेही जायला तयार आहे. तुम्ही कोणतीही चौकशी करा. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मी भेकड असतो तर गप्प बसलो असतो. मी कोठेच गुंतू शकत नाही.
मला कोणाचाही पाठिंबा नाही. मला कोणीही पैसे दिलेले नाहीत. मला कोणीही फोन केलेला नाही. तुम्ही एसआयटी चौकशी करणार असाल तर तुमचेच मला आलेले फोन बाहेर येतील.
त्यांनी मला अनेकवेळा कॉल केलेले आहेत. मग मी पण ते कॉल बाहेर काढतो. होऊन जाऊ द्या मग. माझ्यासाठी जात हे दैवत आहे. मला तुम्ही आता बोलावले तरी मी सलाईन हातात घेऊन चौकशीसाठी येईल.
मात्र, अगोदर हल्ला कोणी केला, हेही तपासा. हल्ल्याचा आदेश देणाऱ्या मंत्र्यांचीही चौकशी करा. गिरीश महाजन यांनी कॉल केला होता. ती रेकॉर्डिंग बाहेर काढा मग. गृहमंत्र्यांपर्यंत सगळेच गुंतून जातील, असा दावा जरांगे यांनी केला.