कोलकाता – राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या २५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करीत आहे. मात्र या यात्रेत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय अजून तृणमूल काँग्रेसने घेतलेला नाही.
ही यात्रा, सध्या आसाममध्ये असून, कूचबिहार जिल्ह्यातील बक्षीरहाट मार्गे २५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार आहे, २७ जानेवारीला बिहारमध्ये पोहोचण्यापूर्वी ही यात्रा पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी, अलीपुरद्वार, उत्तर दिनाजपूर आणि दार्जिलिंगमधून मार्गक्रमण करणार आहे. ती ३० जानेवारीला मालदा मार्गे पुन्हा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करेल ३१ जानेवारीला ती या राज्यातून बाहेर पडणार आहे.
या संबंधात तृणमुल कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की या यात्रेत सहभागी होण्याबाबत आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच, आम्हाला काँग्रेसकडून औपचारिक निमंत्रण मिळालेले नाही. आम्हाला आमंत्रण मिळाल्यावर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू,असे हा नेता म्हणाला.
राज्याचे वरिष्ठ काँग्रेस नेते प्रदिप भट्टाचार्य म्हणाले की, तृणमुल कॉंग्रेसने या यात्रेत सामील व्हावे कारण यामुळे इंडिया आघाडीच्या बाजूने सकारात्मक संदेश जाईल.